प्रवाशांच्या जीवाला धोका; पादचारी पूलही धोकादायक
। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील कोलाड परिसरातील कुंडलिका नदीच्या पुलावर सतत पडत असलेल्या पावसामुळे जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसहित वाहनचालक तसेच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पुलाच्या बाजूने जाणारा पादाचारी पूलही धोकादायक झाला आहे. याला जबाबदार कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील कोलाड परिसरातील कुंडलिका नदीवरील पुलाचे काम चार पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु, पुलावर केलेले डांबरीकरणाचे काम एवढे निकृष्ट दर्जाचे आहे, की पावसाळ्यात दरवर्षी या पुलावर तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पडलेले पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नाही; कारण रस्ता खाली पाणी जाण्यासाठी लावलेले पाईप वर, यामुळे पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे या पुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडते. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवर गोवे येथे गिता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज असून या मार्गांवरून असंख्य विद्यार्थी ये-जा करीत असतात, तर असंख्य गावातील धाटाव एमआयडीसीत कामावर जाणारे कामगार, कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक व कोलाड हायस्कूलकडे जाणारे विद्यार्थी याच मार्गाने ये-जा करीत असतात. परंतु, कुंडलिका पुलावर साचलेले पाणी मोठ्या वाहनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर उडून त्यांना घरी परत जावे लागत आहे. याला जबाबदार कोण?, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून केली जात आहे.





