महाराष्ट्रात वीजगळतीचे प्रमाण चिंताजनक

पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ होऊन विजेचे संकट निर्माण झाले आहे. वीजचोरी किंवा इतर कारणांनी वीजनिर्मिती ते वितरण या दरम्यान होणार्‍या वीजगळतीचा हातही या संकटामागे आहे. पुणे, नागपूर, भांडुप आदी काही महावितरणचे परिमंडल वगळले तर इतर भागांमध्ये विजेची मोठया प्रमाणावर गळती होत आहे.
जळगाव परिमंडळात सर्वाधिक 26.18 टक्क्यांची गळती होत आहे. महावितरणची एकूण सरासरी वीजगळती 15.29 टक्के असून, त्यात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. राज्यामध्ये महावितरणचे सर्व वर्गवारीतील सुमारे 2 कोटी 88 लाखांहून अधिक ग्राहक आहेत. सोळा परिमंडळे, 44 मंडळे, 143 विभाग आणि 638 उपविभाग मिळून राज्यात विजेचे वितरण केले जाते. या माध्यमातून दरवर्षी सुमारे एक लाख 9 हजार दशलक्ष युनिटपेक्षाही अधिक वीजग्राहकांना पुरविण्यात येते. एकूण 41 हजार 928 गावे आणि 457 शहरांना महावितरणकडून विजेचा पुरवठा केला जातो. या सर्वामध्ये विजेच्या गळतीचे प्रमाणही सर्वात महत्त्वाचे ठरते. यंदा राज्याची सरासरी वीजगळती 15.29 टक्क्यांवर आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत ती सुमारे दीड टक्क्यांनी अधिक आहे. जळगाव परिमंडळात सर्वाधिक 26.18 टक्के, त्यापाठोपाठ नांदेड परिमंडळात 25.32 टक्के, तर अकोल्यास 24.09 टक्के वीजगळती आहे. सर्वात कमी वीजगळती भांडुप परिमंडळात 6.06 टक्के, नागपूर, 8.31 टक्के, तर पुण्यात 9.32 टक्के, लातूर- 23.43, जळगाव- 21.07, औरंगाबाद- 17.54, अमरावती- 16.67, कोकण- 15.89, नाशिक- 16.95, बारामती- 14.16, गोंदिया-13.46, कोल्हापूर- 10.27, कल्याण- 9.74, इतकी वीजगळती होत आहे.

Exit mobile version