| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास 40 हुन अधिक गावांचा विद्युत पुरवठा तब्बल 21 तासानंतर सुरळीत करण्यात आला. मध्यरात्री वीज गायब झाल्याने अनेकांना भयंकर त्रास सहन करावा लागला. विद्युत अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्यांचे फोन फॉरवर्ड केले असल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले.
पनवेल तालुक्यातीली 40हुन अधिक गावांतील विद्युत पुरवठा मंगळवारी (दि.7) मध्यरात्री बारा वाजता खंडित झाला होता. अनेकांची झोपमोड झाली. तसेच, वीज नसल्याने अनेकांचे पाण्याविना हाल झाले होते. त्यामुळे कित्येकांना पाण्याचे जार विकत घ्यावे लागले. त्यातच दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ खराब झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांना बसला. मात्र, हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाला तब्बल 21 तासांचा कालावधी लागला. यादरम्यान, नागरिकांकडून वीज कधी येईल, यासाठी वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल फोन फॉरवर्ड केले होते. त्यामुळे कोणाशी संपर्क साधायचा हेच समजत नव्हते. त्यामुळे अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विद्युत पुरवठा 8 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान सुरळीत करण्यात आला. आकुर्ली उपकेंद्रातील 22 केवी एचटी केबलमध्ये फॉल्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. लोड डायव्हर्ट करून काही ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच सुरू करण्यात आला होता. 2.5 किमी लांब केबल असल्यामुळे फॉल्ट आइडेंटिफाय केल्यानंतर केबल जोडण्याचे काम सुरु होते.
ममता पांडे,
जनसंपर्क अधिकारी, महावितरण
