आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’

दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन

। मुंबई । प्रतिनिधी ।

एसटीच्या विविध बसेसमधून दररोज सुमारे 54 ते 55 लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक व बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच, एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. या उद्देशाने 15 जुलै पासून ‘प्रवासी राजा दिन’ या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक एसटी आगारात दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्यादृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.

ही अभिनव योजनेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या-तक्रारी, सुचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी 10 ते 2 या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. तसेच, प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या-त्या वेळी जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्ररीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

या योजनेमुळे प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्यादृष्टीने उपाययोजना करता येतील. यासाठी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे.

डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
Exit mobile version