। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिक येथील नांदूर नाका येथे खासगी बसचा अपघात झाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 30 ते 32 जण जखमी झाले आहेत.
शनिवारी पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास औरंगाबाद कडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात चिंतामणी ट्रॅव्हल्स येत होती. त्याचवेळी अमृतधाम चौफुली कडून टाकळी रोडच्या दिशेने कोळशाने भरलेला आयशर ट्रक भरधाव वेगात येत होता मिरची हॉटेल समोरील चौफुलीवर या दोन्ही वाहनांची क्रॉस धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे 500 ते 600 मीटर ढकलत नेलं. बसच्या धडकेत आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने पेट घेतला आणि त्यानंतर काही क्षणात बस पेटली. अपघात ग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकले. या अपघातात बस चालक जागेवरच ठार झालाय.
घटनेनंतर अनेक स्थानिकांनी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही. त्यांनी प्रशासन व्यवस्थेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे घटनेमध्ये जास्त मृत्यू झाल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून सदर घटनेचा तपास चालू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नाशिकचा दौरा करुन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात उपचार घेणार्यांचीही आस्थेने विचारपूस केली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडललेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख दिले जाणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.