| अलिबाग | प्रतिनिधी |
आंदोलकांवर लाठीमार करणे ही घटना निषेधार्थ आहे. आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाने लाखोच्या संख्येने सहभागी होऊन शांततेच्या मार्गाने लढा दिला. कोणतेही गालबोट न लावता समाजाने आपल्या न्यायासाठी आंदोलन छेडले होते. असे असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे ही नक्कीच निषधार्थ घटना असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी व्यक्त केले.
यापुढे त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणासाठी आंदोलने काढण्यात आली. मोर्चे निघाले. या आंदोलनाकडे संपुर्ण भारताचे लक्ष वेधले होते. शिस्तबध्द पध्दतीने ही आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाच्या दृष्टीने विचार केल्यास जालन्यासारख्या छोट्या ठिकाणी आरक्षणासाठी छोटे आंदोलन सुरु होते. परंतु इतका मोठा निर्णय घेण्याचे काही कारण नव्हते. कदाचीत काहींकडून हुल्लडबाजी झाली असेलही, तरीही एवढ्या मोठ्या स्वरुपात निर्णय घेऊन लाठीमार करणे म्हणजे ही निषेधार्थ गोष्ट आहे.
आतापर्यंत एवढे लढे झाले, राज्यात अनेक मोठे विषय आहेत. त्याबाबत कोणताही निर्णय जलद गतीने घेऊन कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. लाठीमारचा निर्णय नक्की कोणाचा होता. कोणी आदेश दिला. हा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून शंका येते. राज्यात सध्या इंडियाची चळवळ सुुरू आहे. या चळवळीतून समाजमाध्यमांचे लक्ष भटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित केला जात आहे. या लाठीमाराचे पडसाद भविष्यात नक्की दिसून येतील, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी व्यक्त केले.