। पुणे । वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय तपास एजन्सीने (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात पुण्यात आंदोलन केलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनीही घोषणाबाजी देणाऱ्या संशयितांवर गुन्हा दाखल केला.
घोषणा दिल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांच्याबाबत पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवरील देशद्रोहाचं कलम मागे घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या निकालाचा दाखला दिलाय. या निकालानुसार घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलंय.
दरम्यान, आता देशद्रोहाचं कलम लावण्यात न आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.