स्वाती पेशवे
हा केवळ पिठा-मिठाचा जोगवा नाही तर वेळ पडली अस्त्र-शस्त्रांचाही जोगवा आहे. स्त्रीशक्तीचा संकोच करु पाहणार्यांना समूळ नष्ट करण्याचा तो ताकदवान विचार आहे. स्त्रीशक्तीपुढे आव्हानं निर्माण करणार्यांना धारदार कृतीतून मिळालेलं हे चोख उत्तर आहे आणि काळानुरुप प्रश्न बदलले असले तरी स्त्रीविषयक प्रश्नांचा परामर्श घेता हाच त्या सर्वांवरचा अंतिम इलाज आहे. नवरात्रीच्या निमित्ताने घडवलेला विचारांचा जागर.
समाजातली चेतना, संवेदना, वीरता जागृत ठेवण्यासाठी योजल्या जाणार्या अनेक उपायांमध्ये सण-उत्सवांचा समावेश केला तर चुकीचं ठरणार नाही. दर वर्षी काही विशेष सणांच्या, दिवसांच्या निमित्ताने पौराणिक, ऐतिहासिक काळातल्या घटनांची आठवण जपली जाते आणि त्यातला मतितार्थ, बोध अथवा सत्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवलं जातं. एखादा रहाट फिरावा तसंच कालचक्रही या विचारांच्या जळाचं शिंपण नव्या काळावर करत राहतं. वर्तमानाच्या कुशीत ते विचार, त्यातली भव्यता, ते संस्कार पेरण्याचं काम आपसूक होत राहतं. या अर्थाने नवरात्रोत्सवाकडे पाहता एक वेगळी दृष्टी मिळणं अशक्य नाही.
कुळधर्म, कुळाचार म्हणून घराघरात घटस्थापना होणं, नऊ दिवस आणि नऊ रात्री आदिमायाशक्तीचं अधिष्ठान असणं, मनोभावे आणि यथाशक्ती तिची पूजा-आराधना करणं आणि नऊ दिवसांनंतर दसर्याच्या दिवशी उत्सवाची सांगता करणं ही वर्षानुवर्षं पार पाडली जाणारी प्रथा. नवरात्र ही स्त्रीशक्तीची, तिच्या झुंजार वृत्तीची, तिच्या अफाट सामर्थ्याची, बळाची पूजा आहे. एकीकडे सर्जनशील असणारं देवीचं हे रूप प्रसंगी संहारकही होऊ शकतं, हे समाजमनावर बिंबवण्याचं काम या नऊ दिवसांच्या जागराने नेहमीच केलं आहे. सर्जन आणि संहार ही दोन्ही टोकं यात बघायला मिळतात. यात देवीच्या सौम्य रुपाचं स्मरण आणि आराधना होते तसंच तिच्या रौद्र रुपालाही आवाहन केलं जातं. उपवासाच्या सात्विक आणि सौम्य अन्नाच्या सेवनाबरोबरच अखेरच्या दिवशी तिच्यापुढे पशुबळी देण्याची पद्धतही अनेक वर्षं अस्तित्वात होती. एकीकडे खणानारळाने तिची ओटी भरायची, तिला अलंकारानं सजवायचं, तिच्यापुढे घागरी फुंकण्यासारखे खेळ खेळायचे, सकाळ-संध्याकाळ आरती करुन तिची स्तुती करायची तर दुसरीकडे राक्षसाचा संहार करणार्या तिच्या रुद्र रुपाचंही स्मरण करायचं… थोडक्यात, हा केवळ पिठा-मिठाचा जोगवा नाही तर वेळ पडल्यास अस्त्र-शस्त्रांचाही जोगवा आहे. स्त्रीशक्तीचा संकोच करु पाहणार्यांना समूळ नष्ट करण्याचा तो ताकदवान विचार आहे. स्त्रीशक्तीपुढे आव्हानं निर्माण करणार्यांना धारदार कृतीतून मिळालेलं हे चोख उत्तर आहे आणि काळानुरुप प्रश्न बदलले असले तरी स्त्रीविषयक प्रश्नांचा परामर्श घेता हाच त्या सर्वांवरचा अंतिम इलाज आहे. म्हणूनच पारंपरिक पद्धतीने नवरात्रौत्सव साजरा करताना नवविचारांचं भान राखणं गरजेचं आहे.
दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गेचा हा उत्सव साजरा केला जातो. काही भागात त्याची सुरूवात लवकर म्हणजे भाद्रपद वद्य नवमीपासूनही होते. बंगालमध्ये दुर्गापूजेला फार महत्त्व आहे. नेपाळ, आसाममध्ये आणि एकंदरीत उत्तर भारतामध्ये नवरात्रोत्सव हा ‘दुर्गोत्सव’ म्हणूनच उत्साहाने साजरा होतो. गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवानेही आता अनेक ठिकाणी सार्वजनिक रुप धारण केलं आहे. त्यानिमित्त काही कार्यक्रम योजले जातात. पण सर्व उत्सवांचं ‘जल्लोषा’कडे झुकणं ही थोडी चिंतेची बाब आहे हे नाकारता येणार नाही.
नवरात्रीनिमित्त घरोघरी घटस्थापना केली जाते. कुंभाभोवती मातीचं वर्तुळ करुन सप्तधान्य पेरलं जातं, सलग नऊ दिवस कुंभ जलाने भरलेला राहतो. या कुंभातून पाझरणार्या जलाचं सिंचन झाल्यामुळे मातीत मिसळलेली बीजं अंकुरित होतात. कुंभाभोवती या नवांकुरांचं हिरवंगार कुंपण उभं राहतं. विजयादशमीला हेच नवे अंकुरीत कोंब बरोबर घेऊन सीमोल्लंघनाला बाहेर पडतात आणि देवीच्या चरणी हे धन अर्पण करुन आशिष मागितले जातात. वर्षानुवर्षं घटस्थापनेची ही परंपरा पाळली जाते. कृषीप्रधान संस्कृतीमध्ये मनोभावे पाळल्या जाणार्या या परंपरेमागे दडलेलं कृषीभान अथवा संशोधनात्मक विचार दडून रहात नाही. या निमित्ताने शेतातल्या मातीचा कस आजमावण्याबरोबरच मातीमध्ये कोणतं धान्य बीज चांगल्या पद्धतीनं अंकुरतं हे पाहण्याचा विचारही स्पष्ट दिसून येतो. या मासात पाऊस शेवटच्या चरणात असतो. हस्ताचा जोर ओसरल्यानंतर धान्य हाती लागणार असतं. त्यानंतर दुसर्या हंगामातल्या पेरणीची लगबग सुरु होणार असते.
हा हंगाम जमिनीत मुरलेल्या पाण्यावर आणि उपलब्ध जलसिंचनावर पिकाला जीवदान देणारा असतो. अशा वेळी मातीमध्ये नेमकं कोणत्या बीजांचं रोपण करावं याचा अदमास नवरात्रीमध्ये घटाभोवती अंकुरलेल्या धान्यातून येऊ शकतो. मातीचा कस जाणून घेण्याच्या, बीजांची गुणवत्ता जोखण्याच्या या पारंपरिक पद्धतीमध्ये दडलेल्या शास्त्रीय दृष्टीकोनाचा विचारही व्हायला हवा. चरितार्थाचं एकमेव साधन असणार्या त्या काळामध्ये पेरणीपूर्वी देवीला कौल लावायचा, तिच्या साक्षीने एक प्रयोग करुन बघायचा आणि समोर येणार्या निष्कर्षानुसार उचित निर्णय घ्यायचा इतका साधासुधा विचार श्रद्धामार्गाने अवलंबण्याचं भान पूर्वीच्या भोळ्या भाबड्या समाजाला होतं. घटस्थापना हे त्याचं मूर्तीमंत उदाहरण ठरतं. मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकधारणेमध्ये आणि लोकव्यवहारामध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. आताचा समाज प्रगत आहे, शिक्षित आहे. मात्र तांत्रिक प्रगतीच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचलेला समाज भावनिक उंचीचे प्राथमिक निकष तरी पाळतो का हा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे.
मुख्य म्हणजे दिवसागणीक अधिकाधिक उत्साह आणि उन्मादात सण-उत्सव साजरा करणारा हा समाज मानवतेची मूलभूत संकल्पनाच पायदळी तुडवताना दिसतो. तेव्हा आश्चर्य आणि खेद वाटल्याशिवाय रहात नाही. जो समाज आई जगदंबेची पूजा करतो, तिच्यासाठी मोठमोठे मंडप उभारतो, नऊ दिवस विविध कार्यक्रमांच्या साजरीकरणातून उत्सवी वातावरण निर्माण करतो; तोच समाज महिलांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देताना कोणतीही शरम बाळगत नाही. आजही पुरुषी वर्चस्वाचा विचार प्रमाण मानणारी अनेक घरं आहेत. त्या घरांमध्ये आजही महिलांचा आवाज दडपला जातो. तिथे त्यांचं कार्यक्षेत्र विस्तारणार नाही, याची काळजी घेतली जाते. महिलांचा मानसन्मान नाकारणारी, त्यांचं अवकाश नाकारणारी, त्यांना प्रगतीच्या संधींपासून वंचित ठेवणारी अशी अनेक घरं आजही नवरात्रौत्सव अतिशय भक्तीभावाने साजरा करतात, पण घरातल्या स्त्रियांचे हुंदके मात्र त्यांच्या कानी पडू शकत नाहीत. महिलांमधलं कौशल्य, बुद्धिमत्ता त्यांच्या झापडबंद डोळ्यांना दिसू शकत नाही. आजही अशा काही घरांमध्ये मुलीचा जन्म नाकारला जातो. खरं तर अशांना आदिमायाशक्तीची भक्ती करण्याचा हक्कही नाकारायला हवा. मात्र ते होत नाही आणि ही धेंडं अशीच जगत राहतात, स्त्रीशक्तीला पायदळी तुडवत राहतात.
प्रत्येक देवतेने निर्बलांना बल दिल्याचं आणि खलांचा नि:पात केल्याचं आपल्या पौराणिक कथा सांगतात. देवीनेही सलग नऊ दिवस, नऊ रात्री चाललेल्या युद्धात महिषासुराचा वध केल्याची कथा आपण ऐकतो. पण आज किती महिलांमध्ये हे बळ आहे ? आजही अनेकजण अत्याचाराच्या बळी ठरतात. त्यांना अवमानकारक वागणूक दिली जाते. त्यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केला जातो. सध्या पंजाबमधील्या मोहाली इथल्या चंडीगड विद्यापीठातल्या आक्षेपार्ह चित्रफितीचं प्रकरण चर्चेत आहे. स्नानगृहामध्ये कॅमेरा लावून अनेकींचे फोटो व्हायरल करण्याचं हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. दुसरीकडे, आपल्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी नंदूरबारमधल्या एका पित्यावर तिचा मृतदेह तब्बल दीड महिना मिठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवण्याची वेळ आली. आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या त्यांच्या आरोपाकडे पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केलं. पोस्टमार्टमही नीट केलं नसल्याचा संशय त्या हतबल पित्याने व्यक्त केला. बराच पाठपुरावा केल्यानंतर अखेर तिचा मृतदेह मुंबईला आणून पुन्हा एकदा शवविच्छेदन केलं गेलं. या अथवा अशा घटना समाजाची स्त्रीविरोधी आणि तिला दुय्यम स्थान देण्याची मनोवृत्तीच दाखवून देतात. आजही तिला तिच्या न्याय्य हक्कांसाठी लढा द्यावा लागतो. प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध करावं लागतं. अग्निदिव्य केवळ तिच्यासाठीच असतं, अग्निपरीक्षा तिचीच असते. बाहेर कितीही कर्तृत्व गाजवलं तरी तिला घरात सन्मानाची वागणूक मिळेल, याची खात्री नसते. असं असताना हा उत्सव साजरा करण्यापूर्वी समाजाला आरसा दाखवण्याची नितांत गरज असल्याचं जाणवतं. स्त्रीशक्तीची, तिच्या प्रतिमांची पूजा करण्याआधी प्रत्यक्षातल्या स्त्रीशक्तीचा सन्मान होएईल तेव्हाच समाज खर्या अर्थानं तिचा उपासक होऊ शकेल.