| चिरनेर । वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील शेतकर्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या कडधान्य पिकांना चांगलाच बहर आल्याने येथील शेतकरी वर्ग पुरता समाधानी झाला आहे. दीपावली आधी परतीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकर्यांनी दीपावली सणानंतर पाऊस थांबल्यावर कडधान्य लागवडीस सुरुवात केली. त्यामुळे कडधान्य लागवडीस थोडासा विलंब झाल्याने चालू हंगामात कडधान्य पिकांबाबत थोडीशी साशंकतच होती.
परंतु आपली शेती ओसाड ठेवून, वाया घालविण्यापेक्षा शेतकरी वर्गाने वेळ उशिरा शेतात लागवड केलेली कडधान्य पिके चांगलीच बहरली असल्याचे,चित्र येथे पहावयास मिळत आहे. तर अधून मधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरत असल्याचे विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील शेतकर्यांनी शेतात वाल,चवळी, हरभरा, राई, मूग, मटकी, तूर, पावटा, घेवडा आदी कडधान्य पिके घेतली आहेत. तर चवळी, मूग व मटकीची पिके तयार होऊ लागली आहेत. तसेच पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतीले.
चिरनेर परिसरात रब्बी पिके बहरली
