मोकाट जनावरांमुळे रब्बी हंगाम अडचणीत

| पाताळगंगा । वार्ताहर।

गावडुक्कर, रानडुक्कर आणि मोकाट गुरांमुळे शेतकर्‍याला रब्बी हंगामातील पीक घेणे अडचणीचे ठरणार आहे. अनेक शेतकरी चालू रब्बी हंगामात पीक घेण्यासाठी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. पाताळगंगा परिसरात रानडुक्करआणि मोकाट गुरांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे.

रात्रीच्या वेळी मोकाट गुरांचे तांडे शेतात अतिक्रमण करून पिकांचा फडशा पाडत आहेत. गावात कोंडवाडा नसल्यामुळे पकडलेली गुरे कुठे ठेवायची, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. खरीप हंगामात केवळ गावडुक्कर, रानडुक्कर आणि मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकर्‍यांनी भातशेती ओसाड ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात भातशेतीची कापणी झाल्यानंतर शेतात वापसा मिळाल्यावर अनेक शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात; मात्र चालू वर्षी चित्र बदललेले दिसते आहे. कापणी झाल्यानंतर नांगरणीच्या कामाला गती आलेली दिसून येत नाही. मागच्या दोन वर्षांपासून खते, वीजबिल, डिझेल महाग झाल्यामुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच रानडुकर आणि मोकाट गुरांचा उपद्रव दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे शेतकरी आता नुकसानीचा धंदा करायचा नाही, या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे.

Exit mobile version