रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबागसह सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या गर्दी झाल्याने जिल्ह्याचे पर्यटन बहरले आहे. गतवर्षी नववर्षाच्या स्वागतावर लॉकडाऊनचे सावट असल्याने जल्लोषावर गदा आली होती. ही कमी भरुन काढण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटकांची पावले वळू लागल्याने मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची तुफान गर्दी दिसत असून, वाहतूक कोडीं झाल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे खालापूर टोल नाका ते लोणावळा परीसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास 12 तासांहून अधिक काळ या परिसरात वाहतूक संथ गतीने सुरु होती. नाताळाच्या पार्श्वभुमीवर मुंबई, ठाणे, नवीमुंबई परीसरातील नागरिक घराबाहेर पडले आहे. त्यामुळे महामार्गांवरील वाहनांची संख्या शुक्रवारी रात्रीपासून वाढण्यास सुरुवात झाली. खालापूर टोल नाका लोणावळा दरम्यान घाट परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अत्यंत धिम्या गतीने या परिसरात वाहनांची वर्दळ सुरु होती. त्यामुळे पुण्याच्या दिशेला जाणार्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन सुरु होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने घाट परिसरातील कोंडी कमी होत नव्हती. शुक्रवारी रात्री 12 वाजेपासून ते शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत या परिसरात अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सुचनाही देण्यात येत होत्या.
नाताळ सणाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक रायगडात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची भरती आली असून धूम मस्ती करताना पर्यटक दिसत आहेत. अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहीम, आवास, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड, त्याचप्रमाणे श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर आदी सगळेच समुद्रकिनारे बहरले आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक गड, किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढत असल्याने जिल्ह्यातही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली आहे. व्यवसायाला चांगली तेजी आल्याने पर्यटनाभिमुख व्यवसायीकांच्या चेहर्यावर हसू दिसू लागले असले तरी लॉकडाऊनच्या भीतीची किनार देखील पहायला मिळत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आले असल्याने हॉटेल, कॉटेज ही हाऊसफुल झाले आहेत. नाताळ सुट्टी मजा करण्यासाठी पर्यटक आले असले तरी शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटकांचा देखील हिरमोड झालेला आहे.