स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवास प्रारंभ
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्यात जिल्हा परिषदेचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पुढील वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रविवारी जिल्हा परिषदेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शुभारंभ कार्यक्रमात केले.
रायगड जिल्हा परिषदेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव शुभारंभ रविवारी करण्यात आला. यानिमित्त कोविड, अतिवृष्टी काळात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच जनसेवेसाठी उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, कंपनी प्रतिनिधी यांचा सत्कार पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कोविड, महापूर, चक्रीवादळ या समस्यांना मागील काही दिवसात रायगडकरांना सामोरे जावे लागले. मात्र एवढी संकटे येऊनही रायगडमधील नागरिक डगमगले नाहीत या गोष्टीचा अभिमान आहे. या आपत्तीच्या काळात प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सीएसआर विभाग यांनी एकत्रित काम करीत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडली असल्याचे गौरवोद्गार आदिती तटकरे यांनी काढले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,सभापती दिलीप भोईर, गीता जाधव, बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, शेकाप पक्षप्रतोद आस्वाद पाटील, शिवसेना पक्षप्रतोद माणसी दळवी, राष्ट्रवादी पक्षप्रतोद बाजीराव परदेशी, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्रामपंचायतीत विविध योजनांची अंमलबजावणी करून स्मार्ट ग्राम निर्माण करू.
डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषदेने विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी केली आहे. जिल्ह्यात उद्भवलेल्या विविध आपत्तींचा सामना करताना प्रशासनाला नागरिक, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचे सहकार्य लाभले. अनेकांनी स्वतः पुढे येत मदतीचा हात दिला. यापुढेही जिल्ह्यात सर्वांनी मिळून काम करावे.
योगिता पारधी- अध्यक्षा, जिल्हा परिषद