। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे. या पोलीस ठाण्यात 140 पोलिसांचा ताफा दिमतीला असणार आहे. लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून कोकण रेल्वेगाड्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. याशिवाय चोर्यांसह विनयभंगाच्या तक्रारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तातडीने नोंदवणे शक्य होणार असल्याने प्रवाशांच्या सुरक्षीततेत नवी भर पडणार आहे.
कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणार्या महिला प्रवाशांचे दागिने लंपास करण्यासह त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. तसेच, रेल्वेडब्यातील आरक्षित आसनांवरील प्रवाशांचे चोरट्यांकडून मोबाईलही चोरीला जात आहेत. या सार्या गुन्ह्यांची तक्रार बर्याचवेळा मुंबईत आल्यानंतरच संबंधित प्रवाशांना करावी लागते. तक्रारी देण्यास होणार्या विलंबामुळे गुन्ह्याचा छडाच लागत नाही. त्याचबरोबर विनयभंग, छेडछाड व हाणामारीच्या तक्रारीही लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर येत असतात. त्यामुळे, रेल्वे सुरक्षादलाशी संपर्क साधत कारवाई करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागत होते. मात्र, आता प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेगाड्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे.
140 पोलिसांचा फौजफाटा
रत्नागिरी रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कोकण मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित होणार आहे. या लोहमार्ग पोलीस ठाण्यात 140 पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे दरोडे, विनयभंग यांसह कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यास तातडीने कार्यवाही करण्याची प्रक्रियाही जलदगतीने होणार असल्याने गुन्ह्यांचा उलगडा तातडीने होण्यास मदत होणार आहे.
