खा.संजय राऊत यांचा आरोप
। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना खा.संजय राऊत यांनी गोव्यात भाजपकडून नोटांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोप केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसह संवाद साधताना ते बोलत होते.
भारतातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आणि पुन्हा एकदा गुलाबी थंडींच्या ऐन हंगामात देशात राजकीय आरोपप्रत्यारोपाने तापमानात वाढ केली आहे. त्यातच सेना-भाजप पक्षांमधील राजकीय आकस किंवा वैर दिवसागणिक शिखर गाठत असून, परस्परांवर चिखलफेकी सुरुच आहे.
अशातच पुन्हा एकदा शिवसेना खा. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य करत टीकास्त्र डागले आहे. खा.राऊत म्हणाले की, आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपचे नेते ज्या पद्धतीने तिकडे नोटांचा पाऊस पाडतायत. विशेषत: महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा तिकडे चालल्या आहेत.
यामुळे शिवसेनेसारखा पक्ष त्या नोटांशी लढेल आणि तिथल्या जनतेला सांगायचा प्रयत्न करेल की नोटांच्या दबावाखाली येऊ नका. तसेच देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की, तुम्ही कीतीही नोटा टाका पण आम्ही तुमच्या नोटांशी लढू असेही वक्तव्य खा.राऊत यांनी केले आहे.
याशिवाय देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे भाजप प्रभारी असून त्यांनी महाराष्ट्रात झाली तशी गोव्यात जनमताची चोरी होऊ देणार नाही असे म्हटले होते. त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना हे वक्तव्य केले होते. यावरही संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
तर उत्तरप्रदेश राज्यात राजीनामासत्र सुरु आहे. त्यावरूनही राऊतांनी भाजपवर टीकास्र सोडले असून, ते म्हणाले की, ओपिनियन पोलनुसार भाजप सत्तेत येईल अशी चर्चा आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा, पण सत्तेत येणार्या पक्षांना कधी गळती लागत नाही, मंत्री पक्ष सोडत नाहीत, आमदार, कार्यकर्तेही पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा सध्याचा प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने आहे याचा आम्हाला विश्वास आहे असे राऊत म्हणाले.
फडणवीसांमुळे गोव्यात भाजपची पडझड
महाराष्ट्रातून फडणवीस गोव्यात गेले आहेत. पण ते गोव्यात गेले आणि तिथेही भाजप फुटला. नुकताच एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. शिवाय प्रविण झ्यांटे यांनीही पक्षाला रामराम केलाय. यामुळे पक्षांतर्गत सुरु असलेल्या युद्धांना सामोरे जात त्यांचे निस्तरण करावे. – खा. संजय राऊत, शिवसेना