“राजभवन” हे ‘भाजप कार्यालय’ झालं आहे – नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप
| पुणे | प्रतिनिधी |
राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केला आहे. रविवारी पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये व्यर्थ न हो बलिदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. पटोले म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल बोलले. देशाचं वाटोळं नेहरू यांच्यामुळे झालं असं ते बोलले. राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही. राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे, राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. विधानसभेतही मी हे बोललो आहे, असं ते म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, कधीही देशावर हल्ला होऊ शकतो. चीन कधीही हल्ला करेल, त्याबाबत मोदी बोलत नाहीत. माध्यमांनी आता काही लिहिलं तर केंद्र त्यांना नोटीस पाठवते, कारवाई करते. तेव्हा हुकूमशाही होती, आताही झाली. इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये काहीही बदल राहिला नाही. त्यावेळी राजीव गांधींची मोठी बदनामी केली गेली. देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांनाच बदनाम केलं असं ते म्हणाले.

Exit mobile version