घराणेशाही, फोडाफोडीचे राजकारण मारक
खेड | प्रतिनिधी |
खा.सुनिल तटकरे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन शिवेसेना नेते रामदास कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, तटकरे समाजाचे राजकारण करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कोकणात महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. खासदार तटकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. या निर्णय प्रक्रियेत रामदास कदम यांना डावलण्यात आले. जागा वाटपात राष्ट्रवादीला झुकते माप देण्यात आले. त्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषदेत तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप केला. काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनीही तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या दोघांनंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनीही तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते कोणी फोडू नये, असे तिन्ही पक्षात ठरले आहे. दापोलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा हे सर्व खासदार सुनील तटकरे यांनी केल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे तटकरे जाणूनबुजून महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षात नाराजी वाढवत आहेत.
रामदास कदम, शिवसेना नेते.
माझ्यामुळेच ते खासदार
रामदास कदमांची राष्ट्रवादीसह शिवसेनेच्याच लोकांनी गद्दार, अशी हेटाळणी केली होती. त्यावर खुलासा करत कदम म्हणाले, मी कडवट शिवसैनिक आहे. गद्दार म्हटल्याने माझ्या डोळ्यांतून पाणी आले. पण तटकरे यांनी कुणबी भवनाचे निमित्त करून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप कदम यांनी केला. आमदार जाधव यांनी तटकरेंवर घराणेशाहीचा आरोप करत, तटकरे हे माझ्यामुळे खासदार झाल्याचा दावा केला होता.