। उरण । वार्ताहर ।
सध्या घाटमाथ्यावरील पुणे, जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे या जिल्ह्यांमध्ये गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी या संसर्गजन्य त्वचा रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी, उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पशुपालकांनी सावधगिरी बाळगून सतर्क राहावे, असे आवाहन उरण तालुका पशुधन विकास अधिकारी अनिल धांडे यांनी केले आहे.
लम्पी हा त्वचारोग असून, तो गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होतो. या रोगाचा संसर्ग कॅम्प्री पॉक्स या विषाणूंपासून होतो. शेळ्या व मेंढ्यांमधील देवू रोगाशी हा विषाणू संबंधित आहे. चावणार्या माशा, गोचीड, चिलटे बाधित जनावरांचा स्पर्श तसेच दूषित चारा, पाण्यामुळे या रोगाचा प्रसार होतो. या त्वचारोगात जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीला जनावरांना भरपूर ताप येतो. काही जनावरांच्या पायाला सूज येते. नाका-तोंडातून चिकट स्त्राव येवून चारा खाणे बंद करतात. त्यामुळे दुग्धउत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होऊन शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सध्या या त्वचारोगाचा प्रसार चार ते पाच जिल्ह्यात असला, तरी त्याचा प्रसार उरण परिसर व रायगड जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पशुपालकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे पशुधन विकास अधिकारी धांडे यांनी सूचित केले आहे. जर पशुपालकांना या रोगाची लक्षणे दिसून आली, तर आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. गोठ्यात औषधांची फवारणी करून चावर्या माशा, गोचीड, चिलटे यांचा बंदोबस्त करा, असा सांगण्यात आले.