| संगमेश्वर | प्रतिनिधी |
संगमेश्वर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचे गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे एक कोटींपेक्षा अधिक कमिशन थकलेले आहे. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संगमेश्वर तालुक्यात एकूण 134 रास्त भाव धान्य दुकाने आहेत. यामध्ये अनेक सहकारी संस्था आणि बचत गट यांचाही समावेश आहे, जे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून नागरिकांना रास्त दरात धान्य पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र, गेले सहा महिने कमिशन न मिळाल्याने या सर्व दुकानदारांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. यामुळे घरखर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानाचे भाडे आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे दुकानदारांना कठीण झाले आहे. शासनाच्या धोरणात्मक बदलांमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दुकानदारांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे काहीही हाती लागत नसल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत.