। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रात 2 हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. एसटी महामंडळामध्ये झालेल्या घोटाळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले या दोघांनी मिळून केला असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एसटी बसच्या घोटाळ्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात 2 हजार कोटींचा एसटी घोटाळा झाला असून आता तो उघड झाला आहे. हा घोटाळा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनीच केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे, महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याचा तपास केला पाहिजे. आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजेत. बघूयात ईडी काय करते ते, असे संजय राऊत म्हणाले आहेत.