महाड,पोलादपूर येथे दरड कोसळून मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य वितरणास जिल्हा प्रशासनाने केली सुरुवात
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयात पूरपरिस्थितीमुळे कपडे तसेच भांडी/ घरगुती वस्तू यांच्या नुकसानीसाठी तातडीने मदत देण्यासाठी शासनाकडून रुपये 5 कोटी 10 लाख 27 हजार इतके अनुदान प्राप्त झाले असून, बाधित कुटुंबांना संबंधीत तालुक्याच्या तहसिलदारांमार्फत सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
मौजे केवनाळे, ता.पोलादपूर येथील दरड कोसळून मयत झालेल्या 5 व्यक्तींच्या वारसांना, मौजे साखर सुतारवाडी, ता.पोलादपूर येथील दरड कोसळून मयत झालेल्या 6 व्यक्तींच्या वारसांना तसेच महाड शहर येथील महापूरात पाण्यात बुडून मयत झालेल्या 3 व्यक्तींच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु.4 लाख व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी रु.1 लाख असे प्रत्येकी एकूण रु.5 लाख सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच मौजे तळीये, ता.महाड येथील दरड कोसळून मयत झालेल्या 29 व्यक्तींच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु.4 लाख व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी रु.1 लाख असे प्रत्येकी एकूण रु.5 लाख सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे.
त्याचप्रमाणे मौजे तळीये, ता.महाड येथील जखमी झाल्यामुळे उपचार घेणार्या दोन नागरिकांचाही मृत्यू झाला असून त्यांच्याही वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु.4 लाख सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही सुरू असून 5 मयत व्यक्तींच्या वारसांची निश्चिती करण्याची कार्यवाही सुरू आहे.