कासाडी नदीला संजीवनी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर

| पनवेल | वार्ताहर |

तळोज्यातील कासाडी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा विविध स्तरांवर गाजत आहे. या नदीलगत असलेल्या कारखान्यांमुळे झालेले प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अशातच आता आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने कासाडी नदी पुनर्जीवित करण्याचा 235 पानांचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कासाडीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तळोजा एमआयडीसीतून वाहणार्‍या कासाडी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष मुंबई आयआयटी या संस्थेने काढला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर एमआयडीसीतील वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यातील द्रवरूप ऑक्सिजनची घनता कमी झाली आहे. तसेच रसायनांचे प्रमाण वाढल्याने जलचरांना धोका निर्माण झाल्याचे निष्कर्ष काढला आहे.

नदीमुळे भूजल पिण्याअयोग्य

कासाडी नदीचे स्वरूप मर्यादित नसून ही नदीपुढे तळोजा खाडीत वाहत जाते. त्यामुळे नदीतील प्रदूषित पाण्याच्या दुर्गंधीने किनारी असणार्‍या वसाहतींमधील नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कासाडी नदीतील पाण्यामुळे जलचर, पाण्यातील वनस्पती आदी सजीवांच्या जीवाला धोका पोहोचला आहे. तसेच हे पाणी भूजल साठ्यात मिसळल्यामुळे पिण्याचे पाणी, माती प्रदूषित झाली आहे.

रंग बदलणार्‍या नदीची ओळख

पनवेल तालुक्यातील कासाडी ही महत्त्वाची नदी आहे. ही नदी हंगामी स्वरूपाच्या आहे. त्यामुळे एकीकडे कडक उन्हामुळे धरणं कोरडी पडलेली असताना दुसरीकडे मात्र या नदीचे पात्र अनेक ठिकाणी ओले दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे पाणी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रंगाचे असल्याने रंग बदलणारी नदी अशी ओळख आहे.

Exit mobile version