रेवस-रेड्डी कोकणासाठी वरदान

विविध पर्यटनस्थळे येणार प्रकाशझोतात
| सुधीर नाझरे | मुरुड जंजिरा |
राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे रेवस-रेड्डी प्रकल्प. या कोस्टल मार्गासाठी पायलिंग टेस्टिंगच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्यासाठी मागील अर्थसंकल्पात 350 कोटींची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. रेवस-रेड्डी हा मार्ग संपूर्ण कोकणासाठी वरदायी ठरणार असून, समुद्रकिनारे, विविध पर्यटनस्थळे प्रकाशझोतात येणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी रेवस-रेड्डी रस्त्याची संकल्पना आखली होती. परंतु, आता प्रत्यक्षात ते स्वप्न साकार होणार आहे. समुद्रमार्गे जाणार्‍या या रस्त्यासाठी केंद्र शासनाचेसुद्धा सहकार्य मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 350 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. रेवस-रेड्डी प्रकल्पाचे पायलिंग टेस्टिंगचे हे पहिले काम असून, त्याची सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या कामाबाबत येथील स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.


पायलिंग टेस्टिंग म्हणजे काय?
उंच पूल बांधताना जमिनीची पायलिंग टेस्ट केली जाते. यंत्राच्या साह्याने शंभर फूट खोल जमिनीच्या आतमध्ये सापडणार्‍या वस्तूंचे प्रयोगशाळेत टेस्टिंग करून मोठे पूल बांधताना तेथील जमीन भार सहन करेल की नाही यासाठी पायलिंग टेस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विशेष प्रशिक्षित पायटेस्ट करणार्‍यांकडून हे काम केले जात आहे. नांदगाव परिसरात तीन ठिकाणी ही पायलिंग टेस्ट करण्यात येणार आहे. जमिनीच्या आतमध्ये सापडणारे दगड, माती, खडक व अन्य वस्तू प्रयोगशाळेत तपासण्यात येतात. यावरूनच मोठे पूल बांधण्याचे धोरण ठरवले जाते.


काही तासात तळकोकणात
रेवस-रेड्डी हा मार्ग संपूर्ण कोकणासाठी वरदायी ठरणार असून, समुद्रकिनारे, विविध पर्यटनस्थळे प्रकाशझोतात येणार आहेत. रेवस ते करंजा पूल बांधण्यात येऊन सदरील रस्ता थेट मुंबईला जोडण्यात येऊन तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी परिसरापर्यंत होणार असल्याने मुंबईतील लोकांना काही तासातच तळकोकण गाठता येणार आहे.


मुरुडमध्ये मोठा पूल
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागेश्‍वर नगर ते नवीन मजगाव याठिकाणी तीन किलोमीटरचा मोठा पूल बांधण्यात येणार असून, सदरचा मार्ग या मार्गाला बाहेरच्या बाहेर जोडण्यात येणार आहे.

Exit mobile version