| श्रीवर्धन | वार्ताह |
गेले अनेक वर्षे केवळ कागदोपत्री चर्चेत राहिलेला रेवस ते रेड्डी हा सागरी मार्ग अस्तित्वात येणार तरी कधी अशी शंका आता कोकणवासियांना येऊ लागली आहे. कोकणच्या विकासाला चालना देणार्या या महामार्गाच्या निर्मितीकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे कोकणवासियांचे म्हणणे आहे.
विद्यमान स्थितीत अस्तित्वात असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था दननिय अशीच झालेली आहे. त्यामुळे रेवस -रेड्डी सागरी मार्ग पूर्णत्वास गेला तर निश्चितच कोकणचा विकास आणखी झपाट्याने होणार आहे. या नियोजित सागरी महामार्गावर अनेक पूल बांधले गेले. त्यांची देखभाल देखिल केली जात नाही. मार्गात खड्डे व रस्त्यांची दुरवस्था पहायला मिळते. श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडले बाणकोट या महामार्गावरील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पूल बांधून तयार आहेत. दुर्दैवाने आजमितीस त्यांची अवस्थाही वाईट झालेली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासनांपलिकडे काहीच केले नसल्याने सर्वसामान्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
रेवस ते रेड्डी या सागरी पट्ट्यात सध्या मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी जहाजांची ये-जा सुरु असते. त्यामुळे सागरी सुरक्षेचा मुद्दाही यानिमित्ताने ऐरणीवर येत आहे. याचा धोका संपूर्ण राज्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची गंभीर दखल राज्यकर्त्यांनी घेऊन सागरी महामार्ग पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.