कृषी विभागामार्फत आयोजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन दि.4 ते 6 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळेत गुजराती शाळा, डॉ.आंबेडकर रोड, जुने पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून खरीप हंगामात विविध योजनेअंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकामधून उत्पादित झालेले लाल, काळा, जांभळा भात तसेच इतर सुवासिक- इंद्रायणी, बारीक जातीचा-वाडा कोलम, शुभांगी वायएसआर आदी तांदळाची थेट शेतकर्यांकडून योग्य दरात ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रब्बी हंगामात उत्पादित कडधान्य तसेच भाजीपालाही थेट शेतकर्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेले विविध जातींचे तांदूळ, भाजीपाला, कंदमुळे, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विविध महिला बचत गटांची उत्पादने व त्यांचे प्रदर्शनही ग्राहकांसाठी या महोत्सवात प्रमुख आकर्षण असणार आहे. या महोत्सवात भेट देणार्या शेतकर्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. तरी पनवेल शहर व परिसरातील सर्व ग्राहक तसेच शेतकर्यांनी महाराष्ट्र शासन-कृषी विभागामार्फत आयोजित महोत्सवात सहभागी होऊन विकेल ते पिकेल-थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना साखळी विकसित करावी व जास्तीत जास्त शेतकरी उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.