अजय तिवारी
समस्त मानवजातीच्या मुळावर उठलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येणे ही फार मोठी बाब होती. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या आणि अनेकांच्या जीवनयात्रेची अखेर करणार्या या साथरोगाचा प्रसार कमी झाल्यानंतर जगाने मोकळा श्वास घेतला न घेतला तोच आता पुन्हा एकदा याच्या उद्रेकाच्या बातम्यांनी काळजी वाढवली आहे. चीनव्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारांनी हैदोस घातला असल्यामुळे भारताची चिंताही वाढली आहे. सरकार याबाबत सतर्कतेची पावले उचलत आहे. भारतात कोविड-19 च्या नवीन प्रकारांचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तयारी सुरू केली असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाबाबतच्या चर्चेनंतर काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
सध्या कोविड-19 च्या बीएफ-7 प्रकाराने चीनमध्ये कहर केला आहे. या नव्या प्रकारामुळे लोक झपाट्याने संक्रमित होत असून आरोग्य केंद्रांवर कोरोनारुग्णांची वाढती संख्या धोक्याचा इशारा देण्यास पुरेशी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जाणकारांच्या मते, चीनची राजधानी बीजिंगमधील 70 टक्के लोक कोरोनाच्या विळख्यात आले असून हळूहळू मृतांची संख्याही वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही बराच वेळ वाट पहावी लागते. त्यामुळेच भारतासह इतर अनेक देश सतर्कतेच्या मार्गावर आले असून कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगभरात कहर होण्याची भीती व्यक्त होत आहे. ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट असणारे हे बीएफ-7 धोकादायक असल्याचे मानले जात आहे. बीएफ-7 चा संसर्ग दर खूप जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठीचा म्हणजेच उष्मायन कालावधी कमी असतो. घातक बाब म्हणजे लशीचे सगळे डोस वेळेत घेतलेले असूनही याचे सहज संक्रमण होऊ शकते. याशिवाय, जुन्या प्रकाराच्या संसर्गानंतर निर्माण होणारी प्रतिकारशक्तीदेखील सहज खंडित केली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, बीएफ-7 ची लागण झालेला एक रुग्ण किमान 10 ते 18 लोकांना संक्रमित करू शकतो. यावरुनच हा धोका किती मोठा आहे हे स्पष्ट होण्यासारखं आहे.
या पार्श्वभूमीवर बीएफ-7 प्रकार किती धोकादायक आहे हे जाणून घ्यायला हवे. कोविड-19 चा हा उपप्रकार भारतासाठी फारसा धोकादायक नाही, असे तज्ज्ञ सांगतात, पण याचा अर्थ आपण गाफील रहावे असा होत नाही. आपण जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. यासंदर्भात अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा सांगतात की, चीनमधील परिस्थितीबद्दल भारताने काळजी करण्याची गरज नाही, कारण तशी परिस्थिती येथे होणार नाही. मात्र, यासोबतच सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी निर्देशित केले. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले असल्यामुळे बहुतेक लोकांमध्ये संसर्गाशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बीएफ-7 ची तीन महत्त्वाची लक्षणे आढळतात. सुरक्षेचा उपाय म्हणून आपण त्याचीही माहिती घ्यायला हवी. यातील पहिली बाब म्हणजे हा संसर्ग लोकांना झपाट्याने पकडू शकत असला तरी तो फारसा धोकादायक नाही. त्याची लक्षणे ओमिक्रॉनच्या जुन्या प्रकारांसारखीच आहेत. या प्रकाराचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये घशाचा गंभीर संसर्ग, तीव्र अंगदुखी, सौम्य किंवा खूप ताप यासारखी लक्षणे दिसत आहेत. खेरीज सर्दी आणि खोकला बराच काळ टिकत असल्यासही हा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. सहव्याधी असल्यास वा प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास या संसर्गाचा धोका निश्चितच अधिक आहे. त्यामुळेच ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी, थकवा यासारख्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
बदलत्या ऋतूमध्ये बहुतांश लोक सर्दी आणि फ्लू यासारख्या आजारांना बळी पडत आहेत, परंतु तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असेल आणि वर उल्लेख केलेली लक्षणे दिसत असतील तर लगेच कोरोना चाचणी करावी, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी. कोरोनाचा संसर्गदर कमी झाल्यानंतर अनेकांनी मुखपट्ट्या काढल्या. सरकारनेच याविषयीची सक्ती मागे घेतल्यानंतर लोकांनी त्याचे फारसे गांभीर्य ठेवले नाही. मात्र काळजी घेण्याच्या उद्देशाने आता पुन्हा एकदा मास्कने चेहरा झाकणे गरजेचे आहे. शेजारील देशात कोरोना वेगानेे पसरला असल्यामुळे तसेच येत्या तीन महिन्यांमध्ये तिथे 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे ही खबरदारी घ्यायलाच हवी.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे सध्या चीनमध्ये कोरोनावरील उपचारासाठी बेडचा तुटवडा जाणवत आहे. रुग्ण आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. असे असले तरी तिथे लोकांना निर्बंध नको आहेत. त्याबद्दल नाराजी पसरली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लोकांच्या दबावामुळे शून्य कोविड धोरण आणि कडक लॉकडाऊन शिथिल केल्यापासून कमी-अधिक फरकाने कोरोना प्रकरणे वाढत आहेत. आता तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली असून कोरोनाबाधितांना उपचारासाठी औषधे मिळत नसल्याचे आणि जमिनीवर पडून असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी स्मशानभूमीत तीन-तीन दिवस प्रतीक्षा सुरू आहे. यावरुनच मृतांचा आकडा किती मोठा असेल याची कल्पना येते.
ब्रिटीश वेबसाइट ‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, येत्या काळात चीनमध्ये 800 दशलक्षहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे लोकसंख्येनुसार चीन हा जगातील सर्वात मोठा देश आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये जे घडते, त्याचा परिणाम संपूर्ण जगावरही होतो. 2020 मध्ये वुहानमधून कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर जगात काय घडले हे अद्याप कोणीही विसरलेले नाही.
त्यामुळेच चीनमधील कोरोना प्रकरणांच्या स्फोटामुळे सर्व देशांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हा विषाणू अजूनही कमकुवत झालेला नाही आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव घेण्यास सक्षम आहे, असाही याचा दुसरा अर्थ आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू हिवाळ्यात शक्तिशाली होतो आणि तो लोकांना वेगाने संक्रमित करू लागतो. चीनमध्ये हिवाळ्यातच कोरोनाच्या रुग्णांचा स्फोट होत आहे. अशा परिस्थितीत भारत, पाकिस्तान, रशियासह सर्व शेजारी राष्ट्रांनी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांनी आता कोरोना प्रतिबंधक उपाय पाळण्यात हलगर्जीपणा करणे योग्य नाही.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अलिकडेच बीक्यू.1, एक्सबीबीसह कोरोनाचे अनेक नवीन प्रकार जगात दिसले आहेत. परंतु भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणामुळे मृत्यूचा धोका बर्याच प्रमाणात कमी झाला आहे. आकडेवारीनुसार सध्या देशात दररोज कोरोनाचे काहीसे नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 76 हजार झाली तरी त्यापैकी 4 कोटी 41 लाख 41 हजार 854 लोक बरे झाले आहेत. आता देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,559 एवढी आहे. पण ती केव्हाही वाढू शकते. सध्या एखादे ऑपरेशन वा आजार असल्यासच कोरोनाची तपासणी करुन घेतली जाते. कोणतीही संरक्षक साधने न वापरता लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. शाळा-कॉलेज वा तत्सम कोणत्याही संस्था वा कार्यालयांमध्ये याविषयी सक्ती केली जात नाही.
विमानप्रवासातही या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे, परदेशी प्रवास करणार्यांची संख्या वाढत आहे.
सुट्टीच्या या काळात परदेशस्थ भारतीय मोठ्या संख्येने देशात येतात. त्यामुळे हे संक्रमण वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे विषाणू चाचणी, कोरोना प्रकरणांचा मागोवा, तातडीने उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर धोरणात भर देणे गरजेचे आहे.
चीन, जपान, द. कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारांनी हैदोस घातल्यामुळे भारताची चिंताही वाढली आहे. सध्याच्या सुट्टीच्या काळात परदेशस्थ भारतीय मोठ्या संख्येने देशात येत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा मोठा धोका आहे. म्हणूनच विषाणू चाचणी, कोरोना प्रकरणांचा मागोवा, तातडीने उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर भर द्यायला हवा.