। मुंबई । वृत्तसंस्था ।
येत्या सहा फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. वनडे नंतर दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी ऋषभ पंतच्या नावाची उपकर्णधार म्हणून घोषणा करण्यात येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता. पण रोहितच्या अनुपस्थितीत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली. पण राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार्या टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेकडून 3-0 असा पराभव झाला.
केएल राहुल पहिल्या वनडेमध्ये खेळणार नाहीय. त्याच्याजागी पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. बीसीसीआयमधील सुत्रांनी पंतला उपकर्णधार बनवण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिखर आणि ऋषभ दोघेही उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळण्यासाठी सक्षम आहेत. ऋषभ विकेटकिपर असल्यामुळे रिव्ह्यू घेणे, क्षेत्ररक्षण लावणे, यामध्ये त्याची भूमिका, सल्ला महत्त्वाचा असतो. त्यामुळे एका सामन्यासाठी त्याला उपकर्णधार बनवले जाऊ शकते असे बीसीसीआय अधिकार्यांनी सांगितले.