| उरण । वार्ताहर ।
सततच्या पडणार्या पावसामुळे वातावरणात बदल होत असून, ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे घसा खवखवणे, सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहेत. या पावसामुळे झालेल्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, पोटदुखी अशा आजारांमध्ये वाढ होत आहे. यामुळे दवाखान्यात येणार्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यात लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे; तर ग्रामस्थांनी याबाबतची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरचा सल्ला घेऊन औषधोपचार करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पावसामुळे ग्रामीण भागात जागोजागी पडणारे गुरांचे मलमूत्र, खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे कुजणारा पालापाचोळा, शेणाचे खड्डे यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा ठिकाणी औषधफवारणी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.