रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांची कसरत

| पाताळगंगा | वार्ताहर |

खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची काही ठिकाणी दुरवस्था निर्माण झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकानसह प्रवासीवर्गाला करावा लागत आहे. डोळवली व केळवलीदरम्यान तसेच वर्णे गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होत असून, संबंधित अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकानंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाने लाखो रुपये खर्च करुन खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती केली. या रस्त्यामुळे खोपोली-कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले. या रस्त्यामुळे भिवपुरी, नेरळ, बदलापुर, कल्याण आदी शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरु असून, डोळवली व केळवलीदरम्यान तसेच वर्णे गावाजवळ रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने येथील मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत, तर रस्त्यावर काही ठिकाणी जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

अतिवेगाच्या वाहनांमुळे दिवसा, रात्री-अरात्री अंधारामध्ये लहान-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा देत असून, वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरुन आजूबाजूच्या गावातील नागरिक, शाळकरी मुलांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने त्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणी वाहन चालकासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version