ग्राहकांची वाट बिकट ; नेरळ ममदापूर विकास प्राधिकरणचे दुर्लक्ष
रस्त्यांची कामे मंजूर करण्याबाबत प्राधिकरण निरुत्साही
रहिवासी घरे सोडून जाऊ लागले
नेरळ | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सूचनेने नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र, आठ वर्षांत या प्राधिकरणमधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि रवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी करणार्या ग्राहकांची वाट बिकट झाल्याने बहुतेक रहिवासी ममदापूरमध्ये न राहणे पसंत केले आहे.
नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण नेरळ, ममदापुर आणि कोल्हारे येथील नागरी भागातील विकासाचे नियोजन करणार होते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर येथील विकासक यांच्याकडून नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण गोळा करीत असते. मात्र, 2013 पासून आतापर्यंत जेमतेम एक कोटी रुपयांचा निधी या भागातील विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. प्राधिकरणच्या ममदापूर हा परिसर पूर्ण नेरळ ग्रामपंचायतचा भाग होता. मात्र, नेरळ ग्रामपंचायतीमधून बाजूला गेल्यानंतर विकासापासून 10 वर्षे बाजूला असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीमधील भागाचा विकास प्रामुख्याने नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर मार्गावर आला. आता त्याच नागरी भागात तब्बल 200 इमारती उभ्या राहिल्या असून, तीन गृह प्रकल्पदेखील उभे राहिले आहेत. परंतु, या भागात नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरणकडून पायाभूत सुविधांसाठी कोणताही निधी प्राधिकरण खर्च करीत नाही.त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने ममदापुर भाग हा नागरी भाग बाणण्याऐवजी समस्यांचे आगार बनले आहे.या नागरी भागातील चार किलोमीटर लांबीचे रस्ते एकदाही मजबूत पध्दतीने बनवले गेले नाहीत आणि त्यामुळे येथे घर खरेदी करून राहणारे लोकांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे.
परिणामी रस्त्यांअभावी येथे घर खरेदी करून राहणारे यांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे,त्यामुळे अनेक रहिवासी घर सोडून आपल्या शहरात असलेल्या घरी राहायला गेले आहेत.
नेरळ रेल्वे स्टेशनजवळ असल्याने आम्ही ममदापूरमध्ये घर खरेदी केले; परंतु काँक्रिटचे रस्ते, पाणी, सांडपाणी वाहून नेणारी गटारे, पथदिवे यापैकी येथे काहीही नाही आणि त्यामुळे आम्ही येथे घर घेऊन फसलो आहोत. आम्हाला या सुविधा ममदापूर ग्रामपंचायत पुरविणार आहे काय?
श्वेता निळे, स्थानिक रहिवासी
ममदापूर नागरी भागातील आणि गावातून जाणार्या रस्त्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषद आणि प्राधिकरण यांनी केले आहे. हे रस्ते कायमस्वरूपी मजबूत असावेत यासाठी प्राधिकरणचा प्रयत्न असून, सर्व आराखडे तयार केले जात आहेत. त्या सर्व प्रस्तावांना निधीची अडचण नाही, मात्र कागदोपत्री पूर्तता केल्यावर अंतिम स्वरूप येईल.
आर.एस. देवांग, तांत्रिक अधिकारी, नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण, अलिबाग