| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कार्यकारी अभियंता नाही, स्थापत्य उपअभियंताची पाच पैकी दोन पदे रिक्त, यांत्रिकी उपअभियंता आणि देखभाल दुरुस्ती उपअभियंताची पदे रिक्तच आहेत. याचबरोबर शाखा अभियंताची 31 पैकी केवळ 9 पदे भरलेली असून, 22 पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे जिल्ह्याचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जेरीस आला आहे. कामे करताना या विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावणारा म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाहिले जाते. पाणी पुरवठासारखी महत्त्वाची योजना हा विभाग राबवितो. या विभागाच्या कामगिरीवर ग्रामीण जनतेला पाणी योजना मिळणार की नाही, हे अवलंबून असते; मात्र हा विभाग सध्या ही सेवा पूर्ण क्षमतेने देण्यास परिपक्व नाही. कारण अधिकारी पदांसह मंजूर असलेल्या 42 पदांतील केवळ 16 पदे भरलेली आहेत. तर तब्बल 26 पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सध्या हैराण आहे.