। तळा । वार्ताहर ।
दोन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तळा तालुक्यातील संगमनदीला पूर आला आहे. दिवसरात्र कोसळणार्या पावसामुळे तालुक्यातील संगम नदीला पूर येऊन संगम पूल पाण्याखाली गेल्याने बेलघर, चरई, तळेगाव, पन्हेळी, गणेश नगर, कासेखोल आदी गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात चोवीस तास पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने संगमपुलाबरोबर आजूबाजूची शेतीही पाण्याखाली गेली आहे. पावसाचा वाढता जोर पाहता परिस्थिती अशीच राहिली तर भात पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. प्रशासनाकडून नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व पुराच्या पाण्यातुन वाहने चालवू नयेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
संगम नदीला पूर
![](https://krushival.in/grygrars/2024/07/Untitled-design-12-1024x540.jpg)