संघर्ष समितीचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

खोपोलीत वाहतुक कोंडीची समस्या

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोली नगरपालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते दिपक हॉटेल चौक हे वर्दळीचे ठिकाण असून रेल्वे स्टेशन ते बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. परंतु, याठिकाणी रस्त्यावर बसणारे फेरीवाले व बाहेरून येणारे व्यावसायिक यांच्यामुळे शहरात ट्रॅफिकची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असून त्यांच्यावर कारवाई करत अतिक्रमण उठविण्यात आले नाही तर खोपोली पालीकेच्या समोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे खोपोली-खालापूर संघर्ष समितीकडून सांगण्यात आले आहे.

खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी पथकोन याकामी सक्रिय असणे गरजेचे होते. परंतु, संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा बसला असून खोपोली शहर चिंताग्रस्त श्रेणी मध्ये येत आहे. शहरातील या प्रश्‍नावर लक्ष ठेवून मार्ग काढणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, याकामी खोपोली नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. यासंदर्भात खोपोली-खालापूर संघर्ष समितीने पालिकेशी 2 सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केला होतो. तरीदेखील या समस्येत काहीही फरक पडलेला दिसत नाही. यामुळे हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करून लवकरात लवकर अतिक्रमण उठण्यासाठी लाक्षणिक प्रयत्न न केल्यास संघर्ष समितीच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासुन खोपोली नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

संघर्ष समितीने या समस्येबाबत पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली असता ते देखील संयुक्त कारवाई करण्यास तयार आहेत. ही समस्या मिटवण्यासाठी समाजातील सर्व स्तरांचा पाठिंबा मिळत असून या समस्येतून मार्ग निघेल, असा आशावाद स्थानिक व्यक्त करीत आहेत. तसेच, शहरातील नागरी समस्येमुळे शहराची प्रगती खुंटून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. संघर्ष समिती नागरी समस्या सोडविण्यासाठी शहरातील जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन घेऊन लढा देत आहे. हा लढा शहरासाठी क्रांतीचे पावूल असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही नक्कीच जमेची बाजू आहे, असे प्रतिपादन खोपोली-खालापूर संघर्ष समितीने व्यक्त केले आहे.

Exit mobile version