‌‘सतेज’ पाठिंबा अन्‌‍‍ महाडिकांना मिळालं बळ

पवारांची मनधरणी आणि मुश्रीफांची मध्यस्थी ठरली निर्णायक!

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांच्यासमोर खरा अडथळा होता तो आमदार सतेज पाटील यांचा पाठिंबा मिळवण्याचा. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाटील यांची मनधरणी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली आणि मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे पाटील यांनी महाडिक यांना पाठिंबा दिला. पाटील यांच्या पाठिंब्यामुळे दहा हत्तीचं बळ मिळाल्याची प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली. ही घडामोडच 2014 च्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरली.

जिल्ह्याच्या राजकारणात कधीकाळी एकत्र असलेले सतेज पाटील-धनंजय महाडिक हे कधीही वेगळी वाट धरणार नाहीत, असे चित्र एकेकाळी होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांची चांगली गट्टी होती. तत्पूर्वी महापालिकेच्या राजकारणात पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक एकत्र होते. त्यात धनंजय महाडिक नंतर सहभागी झाले. भविष्यात हे दोघेच काय ते जिल्ह्याच्या राजकारणाची घडी बसवतील, विकास करतील, असे चित्र एकेकाळी दिसत होते. पण, महादेवराव महाडिक आणि पाटील यांच्यातच 2007 ला महापालिकेच्या राजकारणातून ठिणगी पडली. त्याचा पुढे वणवा झाला.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिल्याने महाडिक गट नाराज झाला. त्याचे पडसाद निकालात उमटले, तशी जाहीर प्रतिक्रिया महाडिक यांच्याकडून दिली गेली. 2009 च्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती राजकारणापासून अलिप्तच राहिले. 2014 च्या लोकसभेचे बिगुल वाजले. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आणि त्यात कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे गेली. राष्ट्रवादीकडून त्यावेळी धनंजय महाडिक हे एकमेव उमेदवारीचे दावेदार होते. त्यानुसार त्यांना उमेदवारीही मिळाली. पण, खरी अडचण होती ती पाटील यांचा पाठिंबा मिळवण्याची.

त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते आणि त्यात पाटील हे पहिल्यांदाच मंत्री झाले होते. महाडिक यांची उमदेवारी जाहीर झाली तसे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या पाटील यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढली. शरद पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. शेवटी मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने पाटील यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांचे मनोमिलन झाले. पाटील यांनी कार्यकर्त्यांना झाले गेले विसरून महाडिक यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version