। पेण । प्रतिनिधी ।
वरवणे, सावरसई शासकीय आश्रमशाळात व आई डे केअर, चाईल्ड हेवन येथे अंकुर ट्रस्ट व मंचाच्यावतीने बालविवाह बाबत जनजागरण करण्यात येत आहे. संक्रात जवळ येत असतानाच समाज परिवर्तन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सामाजिक क्षेत्रातील तरूणाई जोमाने जागृती अभियानात रंगली आहे. गेल्या सप्ताहात सावित्रीबाई फुलेच्या जयंतीपासून घेतलेला वसा पुढे आहे. 10 वर्षांपूर्वीच्या निर्भया प्रकरणानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण-रायगड येथे महिला अत्याचार मंचाची स्थापना झाली. या मंचामार्फत आता विविध वाड्यांवर व संस्थांमध्ये दुर्लक्षित मुली व महिला करीता ‘घे उंच भरारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
यामध्ये केवळ कायदा सांगून नव्हे तर रोजच्या जगण्यात येणारे प्रश्न जोडून परिणाम साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या अभियानाची सांगता 14 जानेवारी रोजी होणार आहे. याबाबत विविध प्रशिक्षण, संघर्षमय जीवन जगणार्यांच्या वैयक्तिक प्रश्नांची उकल, एकल महिलांना आधार या सर्व बाबींचा सामाजिक स्तरावर विचार विनिमय करण्यात सध्या मंचाचे तरूण स्वयंसेवक आघाडीवर आहेत, अशी माहिती समन्वय कविता पाटील यांनी दिली. ‘सावित्रीच्या लेकी आम्ही मागे आता रहाणार नाही’ असे जाहीरपणे म्हणत पेणमधील आदिवासी महिला व युवतींनी आपल्या जनजागृृती अभियानास सुरूवात केली. अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधीमंच यांचेमार्फत दरवर्षीप्रमाणेच लिंगभेद समानता या विषयावर सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडण्यासाठी अभियानास आजपासून सुरुवात करण्यात आली. या वेळेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील स्वतः उपस्थित होत्या. तसेच तृप्ती धुरी, मीनल सांडे यानी विविध खेळ व जागृती गीते घेऊन सहभागी सावित्रीच्या सर्व लेकीना आनंद दिला.