धोका पातळी ओलांडल्याने अलर्टचा इशारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्याही पाण्याने तूडूंब भरल्या आहेत. सावित्री आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्या भागात अलर्टचा इशारा दिला आहे. तसेच, रोहामध्येदेखील जोरदार पाऊस आहे.
जिल्ह्यातील महाडमधील सावित्री नदीमध्ये 6.60 मी. रोहामधील कुंडलिका 24.25 मीटर इतकी पाण्याची पातळी वाढली आहे. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहामधील आंबा नदीमध्ये 8.70 मी., खालापूरमधील पाताळगंगा नदीमध्ये 19.55 मी., कर्जतमधील उल्हास नदीमध्ये 44.35 मी. पनवेलमधील गाढी नदीमध्ये 3.05 मी. इतका पाण्याचा साठा आहे.
अंबा नदीनेे इशारा पातळी ओलांडली असून उल्हास, गाढी, पाताळगंगा नद्यांमध्ये इशारा पातळीपेक्षा कमी पाणी असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली आहे. सावित्री नदीमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज असून वेगवेगळ्या यंत्रणांना अलर्टचा इशारा दिला आहे. बोटीसह वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.







