| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये कहर माजवला आहे. चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये करोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानेही चौथ्या लाटेला तोंड देण्यासाठी कंबर कसली आहे. भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे रोज आढावा बैठक घेत आहेत त्याचप्रमाणे आरोग्य तज्ज्ञांशी चर्चाही करत आहेत. अशात मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीन, जपानसह काही महत्त्वाच्या देशांमधून येणार्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे, असं मनसुख मांडवीय यांनी स्पष्ट केलं आहे.
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलँड या देशांमधून येणार्या प्रवाशांची RT-PCR चाचणी सक्तीची असणार आहे. ज्या प्रवाशाला लक्षणं आढळतील किंवा ज्या प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येईल. आरटीपीसीआर हा फॉर्मही चीन, जपान, साऊथ कोरिया, हाँगकाँग आणि थायलँडवरून येणार्या प्रवाशांना भरणं सक्तीचं असणार आहे. यामध्ये त्यांना आपल्या प्रकृतीची सद्यस्थिती नमूद करावी लागणार आहे.