डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करण्यासाठी जिल्ह्यात जलजागृतीतून जनआंदोलन उभे करावे, तसेच प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, पाणी स्त्रोत बळकटीकरण, संवर्धन व पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी (दि.29) जलशक्ती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना केले.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल वॉटर मिशनमार्फत मंगळवार (दि 29 मार्च) पासून जलशक्ती अभियान-कॅच द रेन हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा रायगड जिल्ह्यात शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांसह ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
केंद्र शासनाने जलशक्ती अभियानांतर्गत पाऊस पाणी संकलन ही मोहीम राबविण्याबाबत सूचना दिलेल्या असून, 29 मार्च ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात या अभियानांतर्गत विविध कामे हाती घ्यावीत. शाळा, अंगणवाडी इमारती तसेच जिल्हा परिषद अखत्यारीत असलेल्या इतर इमारतींमध्ये पाऊस पाणी संकलन योजना राबवावी. प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, तो ग्रामसभेत मांडवा व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेऊन आराखड्याला अंतिम स्वरूप देऊन अंमलबजावणी करावी, तसेच नागरिकांना जलशपथ द्यावी, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच अभियानांतर्गत करण्यात येणारी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड उपस्थित होते.
राबविण्यात येणारे उपक्रम
1.प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे 1 ते 7 एप्रिल या कालावधीत आयोजन करून जल साक्षरता निर्माण होण्यासाठी नागरिकांना जलशपथ घ्यावी आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत चर्चा व जनजागृती करावी.
2.प्रत्येक महसुली गावाचा गावनिहाय कृती आराखडा तयार करावा व त्यानंतर उपलब्ध पाण्याचे स्त्रोतांच्या नोंदी घ्याव्यात.
3.या अभियान कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग आवश्यक असून, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जलसंधारणाची तसेच पाण्याचे तलाव, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन इत्यादी कामे हाती घ्यावीत.
4.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत झिरपण्यासाठी पाऊस पाणी संकलन व पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.
5.वन क्षेत्रात पाऊस पाणी संकलनाची साधने निर्माण करावीत व मान्सून काळात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने खड्डे व रोपे तयार ठेवण्याचे नियोजन करावे.
6.शासकीय इमारती, शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी छतावरील पाऊस पाणी संकलन करण्याकरिता कामे हाती घ्यावीत.
7.स्व. मीनाताई ठाकरे योजनेंतर्गत ग्रामीण पाणी साठवण टाक्यांची आवश्यकतेनुसार उभारणी करणे, पागोळी विहीर, बंद असलेली भूमीगत साठवण टाकी इत्यादींमध्ये पाऊस पाणी संकलनाचे नियोजन करावे.
8.सदरचे अभियान जन आंदोलनात परिवर्तीत होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी, अभियान यशस्वी होणेसाठी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, जलसुरक्षक, ग्राम पाणीपुरवठा सदस्य यांचा सक्रीय ग्रामस्थ या सर्वांचा सहभाग घेऊन गावात जनजागृती मोहिमेचे आयोजन करावे. गावातील पाण्याचे स्त्रोतांचे Geo Tagging करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर Upload करावे.
9.सदर अभियानांतर्गत केलेल्या कामांची नोंद तज्ञत्काळ जलशक्ती मंत्रालयाच्या संबंधित संकेतस्थळावर करावी.