। रायगड । खास प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील सर्व बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. योजनेतील नामंजूर झालेल्या अर्जांची परत एकदा अवलोकन करून जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करावेत. यासाठी बँकांनी आणि जिल्हा उद्योग केंद्र यांनी समन्वयाने शिबीर आयोजित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे 450 कोटी रुपयांचे उद्दिष्ट 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, बँकांनी व शासकीय अधिकार्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्या. तसेच, शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
अन्य शासकीय योजनांतर्गत बँकांकडे प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत. तसेच, सर्व शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणांची मार्चअखेर उद्दिष्ट पूर्तता करावी. शासनाच्या आणि महामंडळांच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून द्यावा. यासाठी बँकांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्याबरोबरच शासकीय व महामंडळांच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी परस्पर समन्वय ठेवून नियोजन करावे. तसेच, कृषी व तत्सम क्षेत्र, लघु उद्योग क्षेत्र, प्राथमिक क्षेत्राची उद्दिष्टपूर्ती करावी. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनांमध्ये लाभार्थ्यांना भरघोस लाभ देण्यात येतो. त्याअंतर्गत जास्तीत जास्त प्रकरणे होण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी, भारतीय रिझर्व बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे व्यवस्थापक विशाल गोंडखे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, जिल्हा विकास यंत्रणेच्या संचालक प्रियदर्शनी मोरे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक विजय डोके, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दौलकर, आरसेटीचे संचालक सुमित धानोरकर तसेच विविध विभाग व महामंडळाचे अधिकारी, बँकांचे जिल्हा समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते.
बँकांनी ग्राहकांना साक्षर करावे
बँकांनी ग्राहकांना बँकिग सुविधा पूर्वण्याबरोबरच त्यांना आर्थिक दृष्ट्या साक्षर कण्यासाठी पुढाकर घ्यावा. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रीसिल फाऊंडेशन आणि स्वाधार फाऊंडेशनच्या मदतीने ज्या लोकांची बँक खाती नाहीत आणि ज्यांनी सुरक्षा बिमा योजेनेचा फायदा घेतला नाही, त्या सर्वांनी बँक खाती उघडावित आणि योजनेचा फायदा घ्यावा. जास्त व्याज घेणार्या संस्थांमधून कर्ज न घेता सरकारी बँकांमधून घ्यावे, तसेच बनावट नोटा ओळखणे व नाण्यांच्या वापरासंबंधी जिल्ह्यात जनजागृती मेळावे आयोजित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी जावळे यांनी केले आहे.