कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
सायन–पनवेल महामार्गावरील खांदा वसाहत सिग्नल व उड्डाणपुल परिसरात शुक्रवारी दुपारी 12 ते सुमारे 1.30 या कालावधीत चारही दिशांनी भीषण वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई, पनवेल, खांदेश्वर स्थानक तसेच सुखापूरकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी शाळा सुटण्याची वेळ असल्याने अनेक शाळांच्या बस वाहतूक कोंडीत अडकून पडल्या. पीटीए बैठकीसाठी आलेल्या पालकांच्या चारचाकी वाहनांमुळे परिसरातील गर्दीत आणखी भर पडली. रिक्षा, दुचाकी, खासगी चारचाकी, परिवहन बस तसेच बाहेरगावी जाणारी वाहने तासन्तास अडकून राहिली.
रुग्णालयात जाणारे रुग्ण, कामावर निघालेले कर्मचारी, रेल्वे पकडण्यासाठी धावणारे प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रत्येकाला घाई असल्याने अनेक वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत चुकीच्या बाजूने वाहने घालण्याचा प्रयत्न केला. परिणामी कोंडीत आणखी भर पडली. सिग्नल लाल असतानाही अनेक दुचाकी व चारचाकी चालकांनी नियमांचे उल्लंघन करून सिग्नल तोडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पूर्णपणे कोलमडली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही स्थानिक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत वाहने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनचालकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत परिस्थिती अधिकच बिघडविल्याचेही दिसून आले.
स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असून गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वाहतूक शिस्तीचा अभाव कायम असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी हा एक मार्ग असल्याने भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खांदा वसाहत सिग्नल परिसरातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.
गर्दीच्या वेळेत वाहतूक नियोजन, सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा, अतिरिक्त वाहतूक पोलीस, तसेच शॉर्टकट मार्गांवर नियंत्रण यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. “खांदा वसाहत सिग्नलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर सुटणार कधी?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
