। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागसह जिल्ह्यातील अनेक गावांसह वाड्यांमध्ये समाजमंदिरे, सभागृह शेकापच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. सर्व घटकातील समाजाला एकत्र आणण्याचा यातून कायम प्रयत्न करण्यात आला. आज उभारण्यात आलेले हे सभागृह शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आले. सर्व घटकांच्या विकासासाठी शेकाप कायमच कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यातील चौल-वावे मार्गावरील आंबेपूर फाटा येथील नाभिक समाज भवनाचे उद्घाटन सोमवारी (दि.27) चित्रलेखा पाटील आणि ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने चौल-वावे मार्गावरील ही नाभिक समाजाची वास्तू उभारण्यात आली आहे. शेकाप हा नेहमीच नाभिक समाजाच्या पाठीशी उभा राहिला आहे. नाभिक समाजासह इतर समाजाच्या पाठीशीदेखील कायम खंबीरपणे उभा राहणार आहे. कोणत्याही समाजातील व्यक्तीला शैक्षणिक, व्यावसायिक अडचण असेल, तर शेकाप नेहमीच त्यासाठी सहकार्य करेल, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
पुढे त्या म्हणाल्या की, आता अलिबाग तालुक्याचे स्वरूप बदलत आहे. येत्या काही वर्षात खूप विकासकामे येतील. शेकापचा या विकासाकामांना विरोध नाही; मात्र, ही विकासकामे होत असताना स्थानिक व्यावसायिकाला त्याचा फायदा झालाच पाहिजे, ही शेकापची ठाम भूमिका आहे. शेकापचे राजकरण हे भूमीपुत्रांसाठीच होते आणि यापुढेही राहणार असल्याचे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले. तसेच नाभिक समाजासाठी एक लाख रुपयांची रक्कम चित्रलेखा पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आली.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, शेकाप नेते प्रकाश खडपे, सुनील नाईक, विनायक पाटील, अवधूत पाटील आदी मान्यवरांसह विश्वस्त मारूती शिर्के, खराडे, सुदाम शिंदे, रवींद्र देवकर, संवाद कमिटी उपाध्यक्ष रघुनाथ विभार, जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पवार, उपाध्यक्ष रश्मी मोरे, रेवदंडा महिला अध्यक्ष वैष्णवी लाड, उपाध्यक्ष पल्लवी मोरे, चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी, आंबेपूर येथील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.