| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.18) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळाच्या पटांगणात पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा मेळावा पार पडणार आहे.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. गौतम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभारी व बळ देणारा हा मेळावा असणार आहे. या मेळाव्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे मेळावा स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता वातावरण शांत असल्याने मेळावा रविवारी पेझारीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. मेळाव्यासाठी अवघा एक दिवसच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला आदी सर्वच मंडळी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मेळाव्यामध्ये विविध जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरापासून तालुकास्तरावर गठीत केलेल्या वेगवेगळ्या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे एक वेगळी उमेद घेऊन कार्यकर्ते पूर्ण जोमाने कामाला लागणार आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले आहे.