तपास यंत्रणाद्वांरे विरोधकांवर दबाव
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. तपास यंत्रणांचा वापर करीत विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. तसेच देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार्या नऊ विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (बीआरएस), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (तृणमूल काँगेस), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (आप), तेजस्वी यादव (राजद), फारूक (जेकेएनसी), शरद पवार (एनसीपी), उद्धव ठाकरे (शिवसेना, यूबीटी) आणि अखिलेश यादव (सपा) यांचा समावेश आहे.
2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देशात विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचं प्रमाण वाढलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सुवेंदी अधिकारी, मुकूल रॉय, नारायण राणे यांचा समावेश आहे, असा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.