एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र
| रायगड | प्रतिनिधी |
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही कायम असून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद पाहायला मिळतो. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन अनेकदा भरत गोगावलेंना चिमटे काढले आहेत, तर जाहीर सभेत त्यांच्या मफलरची नक्कल करत खिल्लीही उडवली होती. त्यामळे, रायगडमधील हा वाद चिघळला असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध हमुरी-तुमरीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धनंजय देशमुख यांना गावात जाऊन दमबाजी केल्याने जिल्ह्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडे पालकमंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचंही दिसून आलं.
सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांना डावलून एकाकी कार्यक्रम केल्याने शिवसेना पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची वाढती क्रेझ पाहता तटकरे वैयक्तिक कार्यक्रम करू लागले आहेत. भरत गोगावले यांना सतत डावलण्याचं काम सुनील तटकरे यांच्याकडून होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. मंत्री भरत गोगावले यांना डावलण्याचा डाव सुनील तटकरे करत आहेत. मंत्री भरत गोगावले यांची वाढती क्रेझ पाहता तटकरे यांनी त्याचा धसका घेतल्यामुळे तटकरे हे वैयक्तिक भूमिपूजनाचा आणि इतर कार्यक्रम करत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल घोसाळकर यांनी केला. माणगाव आणि इंदापूर बायपास कामाचे भूमिपूजन सुनील तटकरे यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकाकी हा कार्यक्रम केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील मंत्री भरत गोगावले यांना डावलले. त्यानंतर, संतापलेल्या शिवसैनिकांनी शनिवारी तटकरे यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यात एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणाव वाढला असताना, दुसरीकडे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले. अलिबागमध्ये शनिवारी शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात या दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी, प्रशासकीय यंत्रणा जितकी सक्षम तितक्या गतिमान सेवांचा लाभ लोकांना अधिक मिळतो, असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमातील सर्व कामे रायगड जिल्ह्याने शंभर टक्के पूर्ण केल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, यावेळी व्यासपीठावर मंत्री भरत गोगावले हेही उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
