। गडचिरोली ।वृत्तसंस्था ।
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे वाघाने शेतकरी महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. धान पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेचा वाघाने हल्ला केला. नलुबाई बाबुराव जांगडे (वय ३५) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे.
घरी तीन मुली व सतत आजारी राहणारा पती या पार्श्वभूमीवर तिने हिमतीने धानशेती केली होती. धान शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर नलूवर वाघाने अचानक हल्ला केला. यावेळी महिलेचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतातील ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी वाघाला पिटाळून लावले. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनपथक घटनास्थळी दाखल झाले.
वनाधिकार्यांनी पंचनामा करून वारसांना प्राथमिक नुकसान भरपाई दिली आहे. या भागात गेल्या दहा दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन मृत्यू झाल्याने कॅमेरा ट्रॅपसह अन्य उपाययोजना करत वाघाला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.