सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला उभारी, नववर्षाच्या स्वागताला व्यवसायकांची जय्यत तयारी
| दिघी । वार्ताहर ।
नाताळच्या सुट्ट्यांमुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच रिसॉर्ट फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दिवाळी नंतर पर्यटन फुलल्याने व्यावसायिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तालुक्यातील सर्वच ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरलेली दिसत आहेत. मागील दोन वर्षे सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने अनेक उत्सव नियमांचे पालन करत साजरे करण्यात आले. त्यामुळे यावेळी सुट्ट्या सुरू होताच अनेक घरात पर्यटनाचे बेत आखले गेले. या वर्षीच्या पर्यटनाची हौस भागविण्याची जणू काय संधीच मिळाली असून अनेकांनी पर्यटनासाठी कोकणाला पहिली पसंती दिलेली आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच रिसॉर्ट फुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळी नंतर पर्यटन फुलल्याने व्यावसायिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
दिवेआगर येथील लांबलचक समुद्र चौपाटी असल्याने येथे समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणार्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनार्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे कोकण कायमच हवाहवासा वाटतो. धार्मिक पर्यटन करणार्यांसाठी श्रीवर्धन मधील सोमजाई मंदिर, पेशवे मंदिर, दक्षिण काशी हरिहरेश्वर तसेच दिवेआगर श्री सुवर्णगणेश मंदिर आणि मुरुड जंजिरा किल्ला असे अनेक पर्याय आहेत. समुद्र किनार्यावर मौजमजा करणार्या पर्यटकांसाठी श्रीवर्धन, दिवेआगर, वेळास, आदगाव, कोंडविल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सद्या थंडीने जोर धरला असून, थंड हवेच्या ठिकाणांचाही पर्याय आहे. गेली महिनाभर राज्यभरातील शालेय सहलींनी दिवेआगर येथील पर्यटनाचा अनुभव घेतला आहे. कारण येथील सर्वच गावांमधील मंदिरे, जुनी घरे, छोट्या वाड्या हे सारेच पाहण्यासारखे असते.
जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाच्या मुलभूत सुविधांमध्ये आपला ठसा उमटवीत आहे. यावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, निवासी न्याहरी योजना, घरगुती खानावळी आदी पर्यटनावर आधारित विविध प्रकारच्या सेवा देणार्यांनी जय्यत तयारी केली आहे. यावर्षी लाखो पर्यटक श्रीवर्धन ला डेरा ठोकणार असे चित्र पहायला मिळत आहे. मागील दोन वर्षे लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली स्थिती यामुळे कोकणातल्या पर्यटन उद्योगासमोर मोठी आव्हानांची होती. पुढील काळात विस्कळीत झालेली आर्थिक घडी बसली जात आहे. सध्या दिवेआगर मध्येच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ परवाना अंतर्गत निवास आणि न्याहरीचे 600 हुन अधिक हॉटेल व घरगुती साधारण 200 व या व्यतिरिक्त 25 एक प्रमुख खानावळी आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रेलचेल सुरू झाल्याने व्यापारी वर्गाला सुगीचे दिवस आल्याचे आनंद वातावरण तयार झाले आहे.