भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील घटना
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून उपनगरीय लोकल प्रवास करणारे प्रवासी यांनी पार्किंग केलेल्या सहा दुचाकी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. त्या परिसरात असलेल्या गवताला वणवा लागला. भर दुपारी लागलेली आग दुचाकीपर्यंत पोहचली आणि उभ्या असलेल्या सहा दुचाकी आगीत जळून भस्मसात झाल्या.
मध्य रेल्वेचे मेन लाइनवरील कर्जत दिशेकडे असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी हे आपल्या दुचाकी स्थानकाच्या बाहेर पार्किंग करून ठेवतात. गेली अनेक वर्षे त्या गाड्या तेथे पार्किंग करून हे प्रवासी नोकरीच्या ठिकाणी जातात आणि नंतर सायंकाळी रात्री भिवपुरी रोड येथे परत आल्यावर दुचाकी घेऊन घरी परतत असतात. बार्डी गावातील तुषार मोहन कांबरी, चांदइ येथील शिवसृष्टी तसेच रीवा रिदम या सोसायटीमधील रहिवाशी यांच्या त्या दुचाकी होत्या. शनिवारी (दि. 29) सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकी नेहमीच्या ठिकाणी पार्किंग करून ते प्रवासी आपल्या नोकरीच्या ठिकाणी गेले होते. मात्र, दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी असलेल्या गवताला आग लागली. गवत सुकलेले असल्याने आग अधिकच भडकली आणि त्यामुळे त्या आगीचे लोळ दुचाकीपर्यंत पोहोचून गाड्यांना आग लागली. या आगीत सहा गाड्या आगीत जळून खाक झाल्या.
आग लागल्याचे पाहताच भिवपुरी रोड स्थानकातील रेल्वे कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र, आगीत सहाही दुचाकी जळून खाक झाल्या.