पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
| श्रीवर्धन | वार्ताहर |
सर्वसाधारणपणे राज्याच्या अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच तीव्र पाणी टंचाईला सुरुवात होते. मग टँकरने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर येते. श्रीवर्धन तालुक्यात मात्र सुदैवाने टॅकरचा वापर काही मोजक्याच ठिकाणी करावा लागतो. तालुक्याच्या दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धनसारख्या बागायती गावांमध्ये अनेक नागरिकांच्या परसावामध्ये खासगी मालकीच्या विहिरी आहेत. त्यामुळे पाणी टंचाईला फारसे तोंड द्यावे लागत नाही. परंतु यंदाचा तीव्र उन्हमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पिण्याच्या पाण्याची वाढलेली गरज इ. बाबी लक्षात घेता पावसाळा सुरु होईपर्यंत तरी नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, वाड्यांमध्ये नळाचे पाणी सोडून देऊ नये व पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन श्रीवर्धन नगर परिषदेकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
पाण्याच्या सद्यःस्थितीबाबत नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता विकास वागवेकर यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद हद्दीत नळाद्वारे पाणी पुरवठा करणार्या रानवली धरणाची एकूण साठवण क्षमता 2.25 द. ल. घ. मी.इतकी असून ते 121 मीटरला पूर्ण क्षमतेने भरते. 103 मीटरला पातळीला धरणातील पाणीसाठा संपतो. सद्यःस्थितीत धरणातील पाण्याची पातळी 106.5 मी. असून धरणामध्ये 16 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे श्रीवर्धनकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन श्रीवर्धन नगर परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.