रस्त्याची दुुरुस्ती होईपर्यंत जेएसडब्ल्यूची अवजड वाहतूक थांबवा; शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ-अलिबाग मार्गाचे अक्षरशः लक्तरे निघत असून जेएसडब्ल्यू कंपनीच्या अवजड वाहतूकीमुळे या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार असली तरी या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत जेएसडब्ल्यूची अवजड वाहतूक थांबवा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे अवजड वाहनांसह सर्वप्रकारची वाहने देखील नादुरुस्त होत आहेत. रस्त्यात बंद पडत असलेल्या वाहनांमुळे मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असून त्याचा त्रास या मार्गावरुन ये-जा करणार्यांना होत आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पंडित पाटील यांनी म्हटले आहे की, अवजड वाहतूकीमुळे वडखळ ते धरमतर पुलापर्यंतचा रस्ता अतिशय नादुरुस्त झाला आहे. या मार्गाचा मालक नक्की कोण आहे, हे देखील कळायला मार्ग नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते साधा फोनही उचलण्याची तसदी घेत नाहीत. जिल्हा प्रशासन नेमकं काय करते. लोकांनी प्रवास कसा करायचा. अत्यावश्यक वेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल कसे करायचे, असे अनेक प्रश्न पंडित पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
जेएसडब्ल्यूच्या अधिकार्यांसोबत संपर्क साधून त्यांना 80 टक्के वाहतूक त्यांची असल्याची जाणीव वेळोवेळी करुन देण्यात आली आहे. 18-18 चाकांच्या अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरुन केली जाते. त्यामुळे तात्पुरत्या प्रमाणात या रस्त्यावरील खड्डे भरण्याची सुचना देखील त्यांना केली. या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. कंपनी प्रचंड प्रमाणात नफा कमवते. मात्र जिल्हा प्रशासनाचे कंपनीवर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरु आहे. परिणामी, हा रस्ता पुर्ण होईपर्यंत जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहतूक थांबविण्यात यावी, असेही पाटील यांनी सांगितले.
शेकापच्या माध्यमातून वेळोवेळी कंपनी प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे. याबाबत कंपनीने आम्ही हा रस्ता घेतल्याचे सांगितले. तसेच लचकरच रस्त्याचे सिमेेंट क्राँकिटीकरण करणार असल्याचे सांगितले. मात्र कंपनी रस्ता करेल तेंव्हा करेल; मात्र तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पावसाळा उलटून गेला तरी कंपनी प्रशासना रस्त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला विचारणा केली असता हा रस्ता त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागानेही हात वर केले. त्यामुळे जिल्हा प्रशासन, कंपनी प्रशासन तसेच सरकारच्या आडमुठे धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेला भराव चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे रस्ता खाली आणि भराव वर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर हि वेळ आली नसती, असेही पंडित पाटील यांनी म्हटले आहे.