युवापिढीच्या भविष्याचे दरवाजे उघडले
। रोहा । प्रमोद जाधव ।
रोहा येथे शेकापतर्फे बुधवारी ( 12 एप्रिल) आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास अलिबाग, मुरुडप्रमाणेच प्रतिसाद लाभला मेळाव्यात सहभागी झालेल्या शेकडो युवक,युवतींना थेट नोकरींचे नियुक्तीपत्रच मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.पाल्यांना नोकरी मिळाल्याने पालकांचे चेहरेही आनंदाने फुलून गेले.या मेळाव्याच्या निमित्ताने रोह्यातील युवापिढीच्या भविष्याचे दरवाजे उघडल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. रोहा तालुक्यात घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 2,280 जणांपैकी 712 युवक, युवतींना नोकर्या मिळाल्या आहेत.
शेतकरी कामगार पक्ष हा बांधीलकी जपणारा पक्ष आहे. दादा,भाऊंचे विचार घेत चित्रलेखा पाटील यांनी मेळाव्यातून अनेकांना रोजगाराचे दालन खुले करून दिले आहे. सत्ता असल्यावर कोणीही काम करू शकतो. परंतु सत्तेत नसतानाही काम करणारा शेकाप आहे. शेकाप लहान पक्ष असला तरीही पक्षाचे काम मोठे आहे. हे चित्रलेखा पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्यामुळेच बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार पंडित पाटील यांनी काढले.
शेतकरी कामगार पक्ष आयोजित व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रोहा तालुक्यातील सानेगाव, यशवंतखार येथील साने गुरुजी विद्या निकेतन विद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव म्हसकर, जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी, लक्ष्मण महाले, हेमंत ठाकूर, जितेंद्र जोशी, कांचन माळी, विना चौलकर, नंदकुमार म्हात्रे, आदी शेकापचे सर्व पदाधिकारी, पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी, सर्व स्वयंसेवक, युवक व युवती तसेच सर्व कंपन्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार पंडित पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी अनेक शिक्षणसंस्था काढून ग्रामीण भागातील लोकांना नोकर्या दिल्या. गरिबांना शिक्षित केले. हीच परंपरा चित्रलेखा पाटील यांनी कायम ठेवण्याचे काम केले आहे. कोणतेही पद नसताना, सत्ता नसताना प्रबळ इच्छाशकीच्या जोरावर मेळाव्याच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांनी युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
ग्रामीण विकासाला चालना
हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अलिबाग, मुरुड या ठिकाणी मेळावा घेतला हजारोंना नोकर्या मिळाल्या.पक्ष अजून संपलेला नाही हे या मेळाव्यातून चित्रलेखा पाटील यांनी दाखवून विरोधकांना चपराक दिली आहे.पक्ष कधीच संपत नसतो,विचार कधीच संपत नाहीत. ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळाली पाहीजे . या भागात मेळावा घेऊन या भागातील बेरोजगारांना संधी दिली आहे.भविष्यात चित्रलेखा पाटील यांचे नाव घेतल्या शिवाय कामकाज होणार नाही,असे कौतुक पंडीत पाटील यांनी केले.
सर्वसामान्यांचा विचार करणारा शेकाप
शेकाप कायम युवक, कष्टकरी शेतकर्यांचा कायम विचार करणारा पक्ष आहे. कोणत्याही जाती भेद न ठेवता सर्वसामान्यांचा विचार करून शेकापने काम केले आहे . जनता महागाईने ग्रासली आहे. बेरोजगाराची समस्या भीषण आहे . याचा विचार करत गेल्या दोन दिवसांपासून हजारो युवक युवतींना नोकर्या देण्याचे काम शेकापने केले आहे,असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
भरकटलेल्या तरुणाईला रोजगार
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी केले आहे .या विभागात मोठ्या प्रमाणात एमआयडीसीचा विस्तार आहे.मात्र बोटावर मोजण्याइतक्या युवकांना या ठिकाणी नोकर्या दिले आहेत .रोजगाराचे साधन नसल्याने येथील तरुण मंडळी मुंबईत नोकरीसाठी गेले आहेत .त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली आहेत. शिक्षण असून देखील नोकर्या नसल्याने तरुणाई भरकटू लागली आहे.पण शेतकरी कामगार पक्षाने या भरकटलेल्या तरुणाईला रोजगाराच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून दिली आहे . असे रायगड जिल्हा मजदूर फेडरेशन चे अध्यक्ष हेमंत ठाकूर यांनी सांगितले
नोंदणीला प्रतिसाद
रोहा तालुक्यात घेण्यात आलेल्या मेळाव्याला सकाळपासूनच युवक युवतींनी येण्यास सुरुवात केली. मेळाव्यात सहभागी होणार्या युवक युवतींची नोंदणी करण्यासाठी सहा टेबल ठेवण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून नोंदणी गर्दी होऊ लागली. या नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .
50 कंपन्यांचा सहभाग
रोजगार मेळाव्याला येणार्या युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगार मिळावा यासाठी वेगवेगळे 50 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मॅपल, आशापुरा फॅशन, आयसीसीएस अशा अनेक कंपन्यांचे प्रत्येकी एक स्टॉल उभारण्यात आले होते.
रोह्यातील युवक, युवती कष्ट करणारे आहेत. त्यांना संधी द्या. समजून घ्या. अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. आज खूप युवक, युवतींना यश मिळेल. शेकाप काम करणार्यांचा, विचार करणारा पक्ष आहे. कर्तव्यरूपी काम या मेळाव्यातून शेकापने घेतले आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी टीमने खूप चांगले काम केले. या मेळाव्यासाठी रोहा येथील ठाकरे गटाने चांगले सहकार्य केले.
चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख, शेकाप