राजर्षी शाहू छत्रपती यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे त्यांचे वडील त्यांना आबासाहेब म्हणून सर्वजण ओळखत या आबासाहेबांचे पूत्र म्हणजे यशवंतराव हे छत्रपती झाले कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती यांचा अकाली अंत झाला. म्हणून महाराणीसाहेबांनी दि. 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, आणि त्यांचे नामकरण शाहू छत्रपती असे केले. पुढे शाहू महाराज यशस्वी राज्यकर्ते तर झालेच पण राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात त्यांनी जे कार्य केले ते अतुलनीय असे होते. शाहू महाराज हे केवळ साहजिक सुधाकरच नव्हे तर ते राजकीय सुधाकर देखील होते. ते धोरणी मुत्सद्दी होते. दूरदर्शी व खर्या लोकशाहीचे जनक होते. लोकशाहीचा पाया या महाराष्ट्रात खर्या अर्थाने शाहू महाराजांनीच रचला व समाजात जे प्रस्थापित आहेत त्यांच्यात समरस होण्यापेक्षा समाजाला जे उपेक्षित आहेत त्यांच्यात समरस होणेच त्यांना आनंददायी वाटे. दलित पददलित यांना त्या कालखंडात जी बंधन लादणेत आलेली होती त्या बंधनातून त्यांची मुक्तता करणे हे त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते, हे त्यांनी केलेल्या कार्यातून स्पष्ट होते.
तत्कालिन हिंदूस्तानात 700 संस्थानिक होते परंतु महाराजांच्या सामाजिक कार्याची बरोबरी करु शकेल असा एकही संस्थानिक नव्हता. खर्या अर्थाने छत्रपती शिवरायानंतर एवढा लोकाभिमुख प्रजाहितदक्ष बहुजनांना प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाणारा राजा महाराष्ट्र प्रथमच पहात होता हे कोणीही नाकारु शकणार नाही. राजर्षी शाहू छत्रपती म्हणजे सामाजिक सुधारणांच्या संदर्भात एक प्रचंड वादळीवार्याचे मानवी रुप होते. रोगट आणि कुजलेल्या कर्मकांडाचे स्तोम माजवलेल्या आणि वर्ण वर्चस्वाद्वारे सामाजिक गुलामगिरीची निर्मिती केलेल्या विचारांना लाथाडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या उदात्त विचारांनी आणि शाश्वत मुल्यांना महाराष्ट्राच्या भूमीत रुजवण्याचे महान काम या महामानवाने आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत केले. सामाजिक विषमता एखाद्या चरण सिमेला पोहचली होती की, दलित पिडीत बहूजनांना मानवी मुलभूत हक्कच नाकारण्यात आले होते, दलित पिडीत बहुजनांना मानवी मुलभूत हक्कच नाकारण्यात आले होते, हीच अमानवता महाराजांना स्तब्ध बसू देत नव्हती. याच अमानवतेच्या संदर्भात तत्कालिन थोर समाजसुधारक वि.रा. शिंदे यांनी म्हटले होते की, जातीव्यवस्था हा एक विंचू असून जातीभेद हा त्या विंचवाची नांगी आहे तर अस्पृश्यता त्या विंचवाच्या नांगीतील विष आहे. ते विष जर आपण नष्ट केले नाही तर संपूर्ण समाजात त्याचा शिरकाव होईल. हेच विष रोखण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहूंचे मौलिक कार्य आजही पथदर्शक असल्याने त्यांचे विचार आपल्या समाजाला जातीधर्माच्या जोखडातून वाचून आधुनिक मुल्यविचारांकडे नेतील असा विश्वास आहे.
देशाच्या किंवा महाराष्ट्रातील दलित, बहुजन, भटके विमुक्त आदिवासी या वर्गाचा विचार केला तर त्यांना कोठेही नोकरी व्यवसाय मिळत नव्हता. सर्व क्षेत्रात उच्चवर्णीयांनी आपली मक्तेदारी प्रस्थापित केलेली होती. हे महाराजांच्या लक्षात आल्यानंतर या समाजाला मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांना राखीव जागा निर्माण कराव्या लागतील याच विचारातून महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संस्थानात पन्नास टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे नव्या युगाची नांदी ठरेल. स्वातंत्र्यानंतरच्या काळात म्हणजे 7 ऑगस्ट 1990 मध्ये मा.व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवण्याचे धोरण भारतात सर्वांनी स्विकारले परंतु 120 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या मंडल आयोगाची भूमिका कोणाच्या मनातही आली नव्हती त्या काळात कोल्हापूरच्या समतावादी या लोकराजाने सरकारी नोकर्यांमध्ये राखीव जागांचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला होता. मंडल आयोग लागू झाल्यानंतर काही हितसंबंधी गटांनी विरोध केला तसाच विरोध 120 वर्षांपूर्वी देखील झाला होता. परंतु महाराज हे समतावादी विचारांनी प्रेरित असल्याने त्यांनी वर्ण वर्चस्ववाद्यांचा विरोध डावलून आपल्या निर्णयाची चोखपणे अंमलबजावणी केली. म्हणून ते नव्यायुगाच्या आगमनाची घोषणा करणारे अग्रदूत ठरले.
शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण विकास अपेक्षित असल्याने त्यांनी आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा 12 जुलै 1919 मध्ये केला. या कायद्याची अंमलबजावणीची सुरुवात आपापल्या घरापासून केली. जातीभेद निर्मूलन झाले पाहिजे. त्याशिवाय समाजभिसरण होणार नाही म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा 12 जुलै 1919 मध्ये केला. या कायद्याची अंमलबजावणीची सुरुवात आपापल्या घरापासून केली. त्यांच्या चुलत भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांचे पूत्र यशवंतराव यांच्याशी निश्चित केला व अनेक आंतरजातीय विवाह त्यांनी त्यावेळी पार पाडले तसेच स्त्रियांवर अत्याचार होऊ नये म्हणून 2 ऑगस्ट 1919 रोजी स्त्री अत्याचार विरोधी कायदा त्यांनी अंमलात आणला व या कायद्यानुसार स्त्रीवर अत्याचार करणार्या व्यक्तीला 6 महिन्याची शिक्षा व 200 रु. दंड अशी तरतूद केली. त्याचप्रमाणे घटस्फोट झालेल्या स्त्रियांच्या संदर्भात देखील पुनर्विवाह करण्याबाबत कायदा करुन घटस्फोट झालेल्या स्त्रीला अन्नवस्त्र व तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा मार्गी लागेल. याविषयीची व्यवस्था केली. तसेच जातपंचायतीच्या लहरीवर आधारलेला प्रसंगी स्त्रीवर अन्याय करणारा घटस्फोट अमान्य करण्याबाबतची तरतूद देखील त्यांनी केली. तत्कालिन समाजव्यवस्थेमध्ये कनिष्ठ वर्गात देवांच्या नावाने मुली सोडण्याची अनिष्ठ प्रथा म्हणजे देवदासी या प्रथेला देखील शाहू महाराजांनी कायद्याने विरोध केला, तसेच महारवतने खालसा करुन वेठबिगारी प्रथा महाराजांनी बंद करुन फार मोठी सामाजिक सुधारणा घडवून आणली. या सर्व सुधारणा पाहिल्या तर यातून शाहू महाराजांचे पुरोगामित्व सिद्ध होते व काळाच्या अनेक वर्ष पुढे जाऊन भविष्याचा वेध घेणारी दृष्टी त्याच्याकडे होती हे दिसून येते.
आपण जर इतिहासामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला तर असे दिसेल छत्रपती शिवरायानंतर बहुजन समाजाला न्याय हक्क देणारा व विकासाच्या मार्गाने घेऊन जाणारा राजा महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे व बहुजनांचे भाग्यच समजले पाहिजे. जेमतेम 48 वर्ष आयुष्य लाभलेला व 28 वर्ष राज्यकारभार केलेल्या या कृतीप्रवण व्यक्तिमत्त्वाने आपल्या सत्तेचा वापर एवढ्या कुशलतेने केला की आजच्या लोकशाहीतील राज्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात. कृतीमात्र त्या विचारधारेनुसार होताना दिसत नाही म्हणून कृतीतून हे विचार व्यक्ती होतील तेव्हा हा महाराष्ट्र सर्व क्षेत्रात प्रगती करेल व आपले पुरोगामित्व आणखी प्रखरपणे सिद्ध करेल. कारण फुले शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक समनावादी विचारांचे अवमूल्यन झाले तर या देशातील गरीब माणसांची लोकशाही टिकणार नाही हा देश, समाज दुर्बल होईल याचे भान ठेवून आजच्या तरुण पिढीने तसेच राज्यकर्त्यांनी आपले वर्तन ठेवले पाहिजे म्हणून आजच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ महाराजांचे स्मरण करुन चालणार नाही तर त्यांच्या विचारांमधील कृतीशीलता अंगीकारुन प्रत्यक्षात करण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे, कारण मानवतावादी लढाई जिंकेपर्यंत शाहू महाराजांचे विचार आम्हाला सदैवच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहेत. हेच त्यांच्या जयंतीनिमित्ताने सांगता येईल.